Narendra Modi : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात भारताचे वाढते वर्चस्व सिद्ध करणारे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ आजपासून देशाच्या राजधानीत सुरू झाले. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे हा दिमाखदार सोहळा रंगणार असून, ग्लोबल साउथमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी एआय परिषद मानली जात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली. विविध स्टार्ट्सअप बघून टेक्नॉलॉजी जाणून घेत परिषदेचा आढाावा घेतला. याबाबत त्यांनी विविध तज्ज्ञांकडून माहिती घेतली आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते. इंडिया ए आय समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक भारतात येत आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. यामुळे आपल्या देशातील युवकांच्या सामर्थ्याची झलक देखील दिसून येते. या संधीमुळे हे देखील सिद्ध होत आहे की आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहे आणि त्याचवेळी जागतिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. ही परिषद म्हणजे भारताची युवा शक्ती आणि आंतरराष्ट्रीय तांत्रिक परिदृश्यावर उदयाला येत असलेले भारताचे स्थान यांचे एक स्पष्ट प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आरोग्यसेवा, शिक्षण, कृषी, प्रशासन आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनकारी भूमिकेला त्यांनी अधोरेखित केले. या परिषदेत होणाऱ्या विचारमंथनातून नवोन्मेष, सहयोग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार उपयोग याविषयीच्या जागतिक चर्चेत मोलाची भर पडेल आणि एका प्रगतिशील, नवोन्मेषी आणि संधींवर आधारित भविष्याला आकार मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.