Mahabaleshwar News: विक्रेता पोहोचला शेतकऱ्याच्या घरी; माफी मागत पैसे केले परत, पाहा काय आहे नेमका प्रकार
Mahabaleshwar News: ४ महिन्यांत खराब झालेल्या ७.५ HP च्या शेती पंपावरून सुरू होता वाद; विक्रेत्याने पहिल्यांदा नाकारले, पण सरकारी हेल्पलाईनने दाखवली ताकद.

Mahabaleshwar News – ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून शासनाच्या अधिकृत तक्रार निवारण यंत्रणेचा वापर केल्यास न्याय निश्चित मिळू शकतो, याचे प्रत्यंतर सातारा जिल्ह्यातील चिंचणी येथील शेतकरी सुरेश नारायण सावंत यांच्या प्रकरणातून आले आहे. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (1915) आणि महाबळेश्वर ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शनामुळे सावंत यांना शेती पंपासाठी भरलेली 29 हजार 500 रुपये रक्कम पूर्णपणे परत मिळाली.
सुरेश सावंत यांनी शेतीसाठी 7.5 एचपीचा व्हर्टिकल पंप खरेदी केला होता. मात्र, अवघ्या चार महिन्यांत पंपामध्ये गंभीर बिघाड झाला. त्यांनी विक्रेत्याकडे वारंवार तक्रारी करून प्रत्यक्ष भेटी घेतल्या, तसेच लेखी निवेदनही दिले. तरीही त्यांना केवळ आश्वासने मिळाली आणि अखेरीस तक्रार मान्य करण्यास नकार देण्यात आला. पंप निकामी ठरल्याने सावंत यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.
अखेर महाबळेश्वर ग्राहक पंचायतीचे राजेंद्र धोत्रे यांनी ग्राहक पंचायत जिल्हा प्रतिनिधी अभिजीत खुरासणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (1915) वर अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची तातडीने दखल घेतल्यानंतर संबंधित विक्रेता सुरूर येथून थेट चिंचणी येथील सावंत यांच्या घरी पोहोचला. त्यांनी ग्राहकाची दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली आणि पंपासाठी भरलेली संपूर्ण रक्कम परत केली.
त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादावर ग्राहकाच्या बाजूने समाधानकारक तोडगा निघाला. विशेष म्हणजे, स्वतःचे नुकसान होऊनही सुरेश सावंत यांनी मोठेपणा दाखवत विक्रेत्याला माफ केले. आवश्यक कागदपत्रे, संयम आणि शासनाच्या अधिकृत ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेचा योग्य वापर केल्यास ग्राहकांना प्रभावी न्याय मिळू शकतो.



