Pune News : गॅस टंचाईच्या काळात उपाहारगृह चालकांनी ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. याबाबतचा उल्लेख उपाहारगृहचालकांकडून देण्यात येणाऱ्या बिलात करण्यात येत आहे. याबाबत तक्रारी आल्यानंतर नवी दिल्लीतील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून (सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऑथरिटी – सीसीपीए) उपाहारगृहाचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडून जादा पैसे आकारू नयेत, अशा सूचना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत. आखातातील युद्धानंतर गॅस टंचाई निर्माण झाली. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर वापरावर मर्यादा आणण्यात आली. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाहारगृह चालकांनी ग्राहकांकडून जादा पैसे आकारण्यास सुुरुवात केली. काही उपाहारगृह चालकांनी याबाबतचा उल्लेख बिलात करण्यास सुरुवात केली. छापील बिलात गॅस टंचाईचे अतिरिक्त पैसे आकारण्यात आल्याचे नमूद करण्यात आल्याच्या तक्रारी आल्या. याबाबत समाज माध्यमातील तक्रारी, तसेच ग्राहकांकडून तक्रारी करण्यात आली. याची दखल नवी दिल्लीतील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून घेण्यात आली असून, गॅस टंचाईच्या काळात ग्राहकांकडून जादा पैसे आकारु नयेत, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या (सीसीपीए) मुख्य आयुक्त निधी खरे यांनी दिल्या आहेत. ‘सीसीपीए’कडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहे. कोणत्याही उपाहारगृहचालकांनी (हाॅटेल, रेस्टाॅरंट, बार) गॅस टंचाईचे कारण सांगून ग्राहकांकडून जादा पैसे घेऊ नये. उपाहारगृहाच्या आहारतालिकेत (मेन्यू कार्ड) असा उल्लेख करणे ही अनुचित व्यापार पद्धती मानली जाईल, अशा सूचना सीसीपीएने देशभरातील उपाहारगृह चालकांना दिल्या आहेत. गॅस टंचाईचे कारण किंवा सबब सांगून ग्राहकांकडून जादा पैसे आकारणे ही अनुचित व्यापार पद्धती आहे. गॅस टंचाईचे कारण सांगून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा घेणे हे ग्राहक हिताच्या विरोधी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने देशभरातील उपाहारगृह चालकांना दिलेल्या सूचना, तसेच निर्णय हा स्वागतार्ह आहे. – ॲड. ज्ञानराज संत, पुणे जिल्हा कन्झ्युमर ॲडव्होकेटस् असोसिएशन, उपाध्यक्ष