सरकारने सुरु केला ‘छत्रपती संभाजी महाराजां’च्या नावाने पुरस्कार; स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘या’ गीताला पहिला सन्मान!

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajya Prerna Geet Award | महाराष्ट्र सरकारद्वारे यावर्षीपासून ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, यावर्षीच्या पुरस्कारची घोषणाही करण्यात आली आहे. 2025 चा ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी’… या गीताला देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन या पुरस्काराची घोषणा केली. मार्सेलिसच्या समुद्र किनाऱ्यावरून या पुरस्काराची घोषणा करताना आशिष शेलार म्हणाले की, ‘पहिला छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ या अमर प्रेरणा गीताला दिला जात आहे. आमचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे हा पुरस्कार देत आहोत. कारण ते महानयोध्दे, कुशल प्रशासक, पराक्रमी तर होतेच तसेच ते कवी मानाचे आमचे राजे होते. म्हणून हा पुरस्कार त्यांच्या नावे देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा उद्या आत्मार्पण दिन !
वीर सावरकरांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी जे काव्य रचले, त्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’… https://t.co/eNCabtjpyM pic.twitter.com/8OrQuL087P— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 25, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या पुरस्काराबाबत ट्विट करत माहिती दिली. त्यांनी लिहिले की, ‘वीर सावरकरांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी जे काव्य रचले, त्या ‘अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगति असा कवण जन्मला’ या गीताला राज्य सरकारतर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025’ देण्याचा निर्णय घेतला, याचा मला अतिशय आनंद आहे. पुरस्काराचे यंदाचे हे पहिले वर्ष असून, तो दरवर्षी दिला जाणार आहे. 2 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप राहणार आहे. वीर सावरकर यांना कोटी कोटी नमन!’
दरम्यान, ज्या पद्धतीने महाराष्ट्र भूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 2 लाख रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेत ग्रंथ लिहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षी पासून एका प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे.
यावर्षीचा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ या गीताला देण्यात आला आहे. सावरकर पॅरिसहून लंडनला रेल्वेने आल्यावर ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून खटला भरला. त्यांच्यावरचा खटला इंग्लंडमध्ये न चालवता भारतात चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने हिंदुस्थानात नेण्यात आले. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी 8 जुलै 1910 या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली.
सावरकर 60 यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे “अनादी मी … अनंत मी.. हे गीत आहे. तसेच, या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.





