Loni Kalbhor News – पुणे जिल्हा परिषद व पीएमआरडीएच्या माध्यमातून शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पुढाकाराने पुणे-सोलापूर महामार्गालगत मोठा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. पुढील एका वर्षात हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता असून त्याचा फायदा महामार्गालगतच्या सुमारे 25 ते 30 गावांना होणार असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी दिली. कचर्याच्या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या पर्यावरणीय समस्या, दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम यावर या प्रकल्पामुळे कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूर्व हवेलीतील कचरा व्यवस्थापनाला शाश्वत दिशा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ते उरुळी कांचनपर्यंत वाढत चाललेल्या कचर्याच्या समस्येबाबत ‘दैनिक प्रभात’ने वेळोवेळी वृत्तांकन केले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची मागणीही नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. ग्रामपंचायतींनी योग्य वेळी उपाययोजना केल्या नाहीत तर उरुळी देवाचीप्रमाणे परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली होती. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ, उरुळी कांचन, आळंदी म्हातोबाची आदी ग्रामपंचायतींमधील कचरा रोज उचलला जात असला तरी त्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्याने तो उघड्यावर टाकला जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी डास, माशा मोठ्या प्रमाणात वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पुणे सोलापूर महामार्ग कचरा समस्या उघड्यावर टाकलेल्या कचर्यावर भटकी कुत्री ताव मारत असल्याने अनेकांना चावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यातील अनेक ग्रामपंचायती पुणे-सोलापूर महामार्गालगत असल्याने काही ठिकाणी महामार्गाच्या कडेलाच कचर्याचे ढिगारे दिसून येतात. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हद्दीतील कचरा नदीकाठावर टाकला जात असल्याने पर्यावरणाचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. 26 फेब्रुवारी रोजी या कचर्याला भीषण आग लागून चार ते पाच किलोमीटर परिसर धुराने व्यापला होता. ही आग तब्बल चार दिवस धुमसत राहिल्याने कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. कचर्याच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयात 9 मार्च रोजी बैठक पार पडली. या बैठकीत कचर्याचे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण करून त्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीस एमआयटी शिक्षण समूहाचे कार्याध्यक्ष मंगेश कराड, कुलगुरू महेश चोपडे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गटविकास अधिकारी शेलार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच-प्रशासक नागेश काळभोर, माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच नासिर पठाण तसेच ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. दैनिक प्रभातचा पाठपुरावा प्रशांत काळभोर यांनी सांगितले की, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 113 मधील सुमारे 7.34 हेक्टर सरकारी जमीन कचरा प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली असून येथे आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी कचरा प्रश्नाला प्राधान्य देत तो तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशांत काळभोर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसेच ‘दैनिक प्रभात’ने सातत्याने मांडलेल्या कचरा समस्येची दखल घेत हा प्रकल्प साकार होत असून तो पूर्व हवेलीतील गावांसाठी मोठे वरदान ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.