RBI On Satara Bank | भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील सातारा येथील जीजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. या बँकेकडे पुरेशी भांडवल रक्कम नाही आणि उत्पन्नाच्या संधी नसल्याने बँकिंग व्यवस्थेची स्थिरता राखण्यासाठी RBI कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत RBI ने माहिती दिली की, जीजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना यापूर्वी 30 जून 2016 रोजी रद्द करण्यात आला होता. मात्र, बँकेच्या अपीलनंतर 23 ऑक्टोबर 2019 रोजी तो पुन्हा बहाल करण्यात आला. यानंतर अपील प्राधिकरणाने निर्देश दिले होते की, बँकेच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी 2013-14 या आर्थिक वर्षाचे फॉरेंसिक ऑडिट करण्यात यावे. परंतु, बँकेच्या असहकार्यामुळे हे ऑडिट पूर्ण होऊ शकले नाही. या काळात बँकेची आर्थिक स्थिती सातत्याने घसरण होत राहिली. बँकिंग व्यवहार करू शकणार नाही RBI ने असेही सांगितले की, 7 ऑक्टोबर 2025 पासून ही बँक कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करू शकणार नाही. याचा अर्थ बँक आता नवीन ठेवी स्वीकारू शकणार नाही किंवा कोणालाही पैसे देऊ शकणार नाही. त्यामुळे बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू करून यासाठी एक लिक्विडेटर नियुक्त करावा. RBI On Satara Bank | ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंत परतावा मिळेल RBI ने स्पष्ट केले की, बँक बंद झाल्यानंतर प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा दावा डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मार्फत दिला जाईल. सप्टेंबर 2024 पर्यंत बँकेच्या 94.41% ठेवी या विम्याच्या कक्षेत होत्या. मात्र बँकेची आर्थिक स्थिती पाहता, बँक आपल्या विद्यमान ठेवीदारांना पूर्ण पैसे देण्यास असमर्थ असेल. जर बँकेला आपला बँकिंग व्यवसाय पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली, तर याचा जनतेच्या हितावर प्रतिकूल परिणाम होईल. अशा परिस्थितीत तिला पुढे काम करण्याची परवानगी देणे योग्य ठरणार नाही, असंही आरबीआयने सांगितले आहे. RBI On Satara Bank | हेही वाचा: “काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात”; अजित पवारांनी भुजबळांच्या भूमिकेवर व्यक्त केली नाराजी