एलआयसीतील हिस्सा विक्रीला कर्मचाऱ्यांचा विरोध
नवी दिल्ली : केंद्र सरकारने चालु आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प संसदेत सादर केले. दरम्यान, या अर्थसंकल्पात एलआयसीविषयी महत्वपुर्ण घोषणा करण्यात आली. एलआयसीमधील हिस्सा सरकारकडून विक्रीस काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सरकारच्या याच निर्णयाला एलआयसीच्या कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. भारतीय जीवन विमा महामंडळातील (एलआयसी) हिस्सा विक्रीच्या सरकारच्या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सरकारच्या प्रस्तावाचा निषेध करण्यासाठी एलआयसीचे कर्मचारी येत्या 4 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. परंतु, हा संप फक्त एक तासासाठी असून तासाभराने पुन्हा कामावर रुजू होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
अर्थसंकल्पाच्या वेळी अर्थमंत्री सीतारमण यांनी जाहीर केले की, सरकार एलआयसीमधील आपला हिस्सा विकणार आहे. यासाठी सरकार आयपीओ आणत आहे. भारतीय जीवन विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडे देशातील जीवन विमा बाजारातील सुमारे तीन चतुर्थांश हिस्सा आहे.
एलआयसीच्या निर्गुंतवणुकीच्या निर्णयाला विरोध दर्शवताना, जीवन विमा कॉर्पोरेशन कर्मचारी संघटनेच्या कोलकाता विभागाचे उपाध्यक्ष प्रदीप मुखर्जी यांनी, आम्ही मंगळवारी सकाळी 12:30 ते दुपारी 1.15 वाजेपर्यंत एक तासाचा संप करू. देशातील सर्व कार्यालयांमध्ये निदर्शनांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जर सरकारने आपला निर्णय बदलला नाही तर वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू असेही एलआयसीच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.