राजगुरुनगर : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश घुमटकर यांनी शहराला ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने नेण्यासाठी व्यापक विकास आराखडा जाहीर केला आहे. नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी प्रभागातील तसेच संपूर्ण शहरातील मूलभूत सुविधा व सार्वजनिक सुरक्षेतील उणिवा दूर करून आधुनिक आणि सुबक शहर उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. घुमटकर म्हणाले, “शहराच्या भविष्यासाठी ठोस नियोजन आवश्यक आहे. भीमा नदीकाठच्या परिसरात केदारेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण, वडाच्या झाडाजवळ पार तयार करणे आणि तेथे नाना–नानी पार्क उभारण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांना शांत, सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळावे हा आमचा उद्देश आहे.” प्रभागातील सर्व भाग सीसीटीव्हीच्या मदतीने निगराणीखाली आणण्यासाठी ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्याचे काम प्राधान्याने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी शहरात गार्बेज टू गार्डन ही संकल्पना शहरातील वाडा रोडवर पाण्याच्या टाकीजवळ राबवली होती. नागरिकांनी त्यासाठी मोठा प्रतिसाद दिला होता. रस्ते, गटार, पाणीपुरवठा आदी मूलभूत सेवांमध्ये सातत्याने काम केल्याचे सांगितले. भीमा नदी काठावरील वडाचे झाड ते प्रसिद्ध केदारेश्वर मंदिरापर्यंत दगडी घाट बांधण्यात येणार असल्याचे घुमटकर यांनी स्पष्ट केले. “भाजपच्या माध्यमातून आमच्या प्रभागात अनेक विकास योजनांना गती मिळाली आहे. नागरिकांनी दिलेल्या विश्वासामुळेच ही कामे शक्य झाली. पुढील काळातही मतदारांनी भाजपसोबत रहावे आणि आम्ही त्या विश्वासाला पात्र राहू.” निलेश घुमटकर – प्रभाग क्रमांक ८ भाजप उमेदवार नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक भाजप बहुमताने जिंकेल असा विश्वास घुमटकर यांनी व्यक्त केला. राज्यात आणि केंद्रात भाजप शासन असल्याने राजगुरुनगरच्या विकासासाठी अतिरिक्त निधी मिळण्याची संधी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. “आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. राजगुरुनगर नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आणून शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे,” असे घुमटकर यांनी सांगितले. राजगुरुनगरमध्ये सध्या निवडणूक वातावरण तापले असून विविध पक्षांकडून विकासाच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र प्रभाग ८ मधील घुमटकर यांची स्मार्ट सिटीची संकल्पना नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.