Landslide Threat : ‘आमचे माळीण होऊ देऊ नका!’; महाराष्ट्रातील ‘या’ गावावर मोठं संकट, ग्रामस्थांची आर्त हाक
Landslide Threat : पुणे जिल्ह्यातील २०१४ मधील माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळा; पावसाळा तोंडावर असल्याने तातडीने पुनर्वसन करण्याची गावकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी.

Landslide Threat – ठोसेघर परिसरातील दुर्गम मोरेवाडी गावावर संभाव्य दरडसंकटाचे सावट गडद होत असून, गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या जमीन खचण्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाव परिसरातील जमिनीत मोठ्या प्रमाणात २०१९ पासून भेगा पडत असून, काही ठिकाणी जमीन सरकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पावसाळा तोंडावर आलेला असताना ‘मोरेवाडीचे माळीण होऊ नये,’ अशी आर्त हाक ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी केंद्रीय पथकाने गावाची पाहणी करून अहवालही सादर केला होता. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातील २०१४ मधील माळीण दुर्घटनेचा संदर्भ देत,‘“तशी वेळ आमच्यावर येण्यापूर्वी शासनाने जागे व्हावे,’ अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.
मोरेवाडीतील अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून परिसरातील शेतजमिनीमध्येही खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक कुटुंबांना भीतीच्या छायेखाली दिवस काढावे लागत आहेत. ‘कधी डोंगर कोसळेल आणि जीवितहानी होईल, याची शाश्वती नाही,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावातील बहुतांश नागरिक शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहेत.
त्यामुळे पुनर्वसन करताना गावाजवळच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शेती, जनावरे आणि मुलांचे शिक्षण यांचा समतोल राखता येईल, अशी मागणी पुढे आली आहे. दुर्गम भाग असल्याने रोजगाराची इतर साधने उपलब्ध नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. महिला, वृद्ध आणि शेतकरी यांनी भावनिक शब्दांत प्रशासनाकडे मदतीची याचना केली.
‘आमच्याकडे ना राजकीय पाठबळ आहे, ना आर्थिक ताकद. दुर्घटना घडण्यापूर्वी शासनाने हस्तक्षेप करावा,’ अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी भूगर्भतज्ज्ञांकडून नव्याने सर्वेक्षण करून गाव सुरक्षित आहे की नाही याचा अहवाल जाहीर करावा, तसेच तातडीने पुनर्वसनाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





