– हेमंत देसाई
“आता मी भाजपसोबत काम करू इच्छित नाही’, असे जाहीर करून चंद्रकुमार बोस यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपातून बाहेर पडण्यामागील अर्थ समजून घेऊया.
थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले आयुष्य देशासाठी वेचले. त्यांनी कधीही स्वार्थाचा विचार केला नाही. त्यांचा प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक पाऊल हे देशाच्या स्वातंत्र्य आणि विकासाच्या दिशेनेच पडले होते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या जानेवारीत कोलकाता येथे केले होते. भारत हा महान देश व्हावा, हे स्वप्न नेताजींनी पाहिले आणि ते आजही अधुरे राहिले आहे व ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असल्याचेही भागवतांनी म्हटले होते. खरे तर नेताजींचे आपणच वारस असल्याचा हिंदुत्ववाद्यांचा आविर्भाव असतो. पंडित जवाहरलाल नेहरूंनी नेताजींना पुढे येऊ दिले नाही आणि त्यांच्यावर अन्याय केला, असे भाजपचे प्रतिपादन असते.
वास्तविक, नेहरू आणि नेताजी हे दोघेही विज्ञानाचे उपासक, धर्मनिरपेक्षतावादी आणि डाव्या विचारांचे होते. भारताच्या नियोजित विकासासाठी नियोजन मंडळ स्थापन करावे, ही कल्पना नेताजींची होती आणि ती नेहरूंनी यशस्वीपणे राबवली. हिंदू महासभा बंगालमध्ये राजकीय पक्ष म्हणून पाय रोवणार असेल, तर त्या पक्षाच्या जन्मापूर्वीच हा प्रयत्न मोडून काढण्याचा निर्धार नेताजींनी व्यक्त केला होता. नेताजींच्या मृत्यूबद्दलही अफवा पसरवून, सर्व दोषांचे खापर नेहरूंवर फोडण्याचे प्रयत्न दीर्घकाळ झाले.
वास्तविक, नेताजी हे मतभेदांनंतर कॉंग्रेसबाहेर पडले, तरीदेखील कॉंग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनाबद्दल त्यांना आदरच वाटत होता. महात्मा गांधींना त्यांनी पहिल्या प्रथम “राष्ट्रपिता’ संबोधले होते. गांधी आणि नेहरू यांनी हिंदू-मुस्लीम बंधुभाव जोपासण्याचा प्रयत्न केला आणि नेताजींचा अकाली मृत्यू झाला नसता, तर तेही धर्मनिरपेक्षतेच्या रस्त्यावरूनच गेले असते; परंतु तरीही नेताजींच्या घराण्यातील व्यक्तींचा आदरसत्कार करणे, प्रसारमाध्यमांतून त्यांना चमकवणे, जुनी कागदपत्रे काढून नेहरू सरकारने नेताजींची कशी उपेक्षा केली, हे दाखवण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून वारंवार घडल्या आहेत. अर्थात, पश्चिम बंगालमधील अनेकविध राजकीय पक्ष हे बोस कुटुंबातील सदस्यांना आपल्या पक्षात घेऊन, त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. भारतीय जनता पक्षाने नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांना 2016 साली पक्षात घेतले होते.
पक्षाचे प्रवक्ते म्हणून देखील ते आरंभी सातत्याने वृत्तवाहिन्यांवर दिसत असत. परंतु “आता मी भाजपसोबत काम करू इच्छित नाही’, असे जाहीर करून चंद्रदांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. केवळ मतांसाठी पक्षाकडून फूटपाडू राजकारण होत असल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपला विस्तारण्याच्या संधी नष्ट झाल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तर चंद्रदा हे गेल्या काही वर्षांपासून पक्षात सक्रिय नव्हते आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही. आम्ही चंद्र बोसांबद्दल नाही, तर चांद्रयानाबाबत बोलू. चंद्रदांनी पक्ष अगोदरच सोडला होता. म्हणजे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते कधी आलेच नाहीत. ते कोणतेही काम करत नव्हते, अशी टीका भाजपचे पश्चिम बंगालमधील प्रदेश प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी केली आहे.
वास्तविक, 2024 च्या लोकसभा निवडणुकांत भाजपच्या दृष्टीने प्रत्येक राज्य हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्रात 45 जागा निवडून आणण्याचे लक्ष्य भाजपने ठरवले आहे, त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधून लोकसभेच्या 35 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरवून दिले आहे. त्यासाठी भाजपला पश्चिम बंगालमधील मध्यमवर्गीयांचाही पाठिंबा आवश्यक आहे. चंद्र बोस यांच्यासारख्या व्यक्तींनी पक्ष सोडला, तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. पक्षाने नेताजींच्या कुटुंबीयांना दगा दिला, अशी भावना पसरू शकते, हेही खरे. चंद्रकुमार बोस हे नेताजींचे बंधू शरच्चंद्र बोस यांचे नातू. ते लंडन येथील एका कॉलेजमधून अर्थशास्त्राचे पदवीधर झाले. मग जमशेदपूर येथील टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करू लागले.
त्यानंतर चंद्रदांनी कोलकाता येथे परतणे पसंत केले. तेथे टाटा समूहातच मार्केटिंग प्रमुख म्हणून ते काम करत होते. त्यानंतर चंद्रदांनी मनुष्यबळ विकास आणि कौशल्य विकास या क्षेत्रात सल्ला-सेवा देण्यासाठी स्वतःची कंपनी स्थापन केली. तिसऱ्या जगातील देशांमध्ये मानवी हक्कविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी काम करणाऱ्या “इंडियन सोशालिस्ट डेमोक्रॅटिक फोरम’चे सरचिटणीस म्हणूनही ते काम करतात. भाजपामध्ये प्रवेश करताना आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी पक्ष प्रयत्न करेल. देशातील सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्य अबाधित ठेवण्याचे काम केले जाईल आणि नेताजींचा वैचारिक वारसा जपला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रदांना दिले होते. दर महिन्याला नेताजींच्या संदर्भातील वीस-तीस फाइल्स सरकारी दप्तरातून बाहेर काढल्या जातील, हे त्यांनी दिलेले आश्वासनही पाळण्यात आले नाही.
नेताजींच्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी आपल्याला केंद्र अथवा राज्यपातळीवरून कोणतेही पाठबळ मिळाले नाही. याबाबत आपण पाठवलेले कोणतेही प्रस्ताव स्वीकारण्यात आले नाहीत, उलट पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. देशातील सर्व जातीधर्म आणि पंथांतील समाजघटकांना एकत्र आणण्यासाठी भाजपच्या चौकटीतच “आझाद हिंद मोर्चा’ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता; परंतु यापैकी काहीही घडून न आल्यामुळे चंद्रदा नाराज झाले आहेत. “इंडिया विरुद्ध भारत’ हा वादही नाहक उकरून काढण्यात आल्याचे त्यांचे मत आहे. चंद्रकुमार बोस हे 2016 मध्ये पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष होते. पण चार वर्षांतच त्यांना या पदावरून हटवण्यात आले. प्रदेश भाजपमध्ये त्यांना उपेक्षेचीच वागणूक देण्यात आली.
चंद्रदा हे केवळ उच्चभ्रू वर्तुळातच वावरत असतात. सामान्य जनतेच्या प्रश्नांशी त्यांचा काहीही संबंध नाही आणि त्यांचा पक्षाला काही एक उपयोग नाही, असे भाजपच्या प्रदेश नेत्यांना वाटत होते. 2019 मध्ये चंद्रदांनी पक्षाच्या विरोधात जाऊन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला होता. या व त्यांच्या इतर काही गोष्टी पक्षाला रुचलेल्या नव्हत्या. अर्थात, नेताजींचे नाव केवळ कॉंग्रेसला नावे ठेवण्यासाठी भाजपने वापरले आणि एवढे सगळे करूनही त्याचा फारसा उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर, बोस कुटुंबियांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मुळात नेताजींची आणि भाजपची विचारसरणी यातच जमीनअस्मानाचा फरक असल्यामुळे, चंद्रकुमार बोस यांनी त्या पक्षात जाणेच चूक होते. आता ते भाजप बाहेर पडल्यामुळे त्या पक्षाची आणि चंद्रदा या दोघांचीही सोय झाली आहे!