Kunal Kamra : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराच्या या वादग्रस्त गाण्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी आक्रमक भूमिका घेत हॉटेलसह सेटची तोडफोड केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भांत प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामराला हे माहिती पाहिजे की राज्याच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आहे हे जाणून दिले आहे. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेनी ठरवलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
पुढे म्हणाले, हे अत्यंत चुकीच आहे, तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचे काम जर कोणी करेल तर हे सहन केले जाणार नाही. अतिशय चुकीचे आहे. कामरानी माफी मागितली पाहिजे आणि तेजस संविधानाच पुस्तक दाखवत आहेत. त्यांनी जर संविधान वाचला असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेले आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की, त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
कुणालची पहिली प्रतिक्रिया
कुणाल कामराने यावर थेटपणे कुठलेही भाष्य केले नाही. पण हातात भारतीय राज्यघटनेची एक प्रत घेऊन त्याने फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शनमध्ये त्याने म्हटले, ‘The Only Way Forward’. यामधून त्याला सुचवायचे असेल की, आव्हानावर मात करण्यासाठी भारतीय संविधान हाच सर्वात आशादायी मार्ग आहे. सध्या त्याची ही इंस्टारग्राम पोस्ट चर्चेत आली असून, मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.
काय म्हणाले होते कुणाल कामरा?
शिवसेना भाजप पक्षामधून बाहेर आली. पुढे शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. त्यानंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. एका मतदाराला ९ बटन दिले. यामुळे सर्व संभ्रमात पडले. एकाने पक्ष चालू केला होता. ते खूप मोठा जिल्हा ठाणे, तिथून येतात, असा टोला कुणालने कवितेतून लगावला आहे. यांचे हे राजकारण आहे. त्यांना घराणेशाही संपवायची होती. त्यामुळे कुणाचा बाप चोरून घेतला.
आता काय रिप्लाय असेल? मी उद्या तेंडुलकरच्या मुलाला भेटू का, त्याला सांगतो चल भाई जेवण करुयात. त्याच्या वडिलांचे कौतुक करतो आणि सांगतो, भाई तुझा बाप आजपासून माझा बाप, असा मिश्किल टोला कामराने लगावला. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. कुणाल की कमाल. जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.