मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्येमध्ये सहभागी असलेला कृष्णा आंधळे अध्यापही फरार आहे. त्याचा कोणताही थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली. तेव्हापासून कृष्णा आंधळे गायब आहे. त्याचा शोध घेऊनही तो सापडलेला नाही. त्यामुळे त्याच्या जिवंत असण्याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे. आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील मोठं विधान केलं आहे. संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही याविषयी मला डाऊट आहे. पोलिस त्याचा तपास करत आहेत. पण तो सापडत नसल्यामुळे त्याचा खून झाला असावा अशी मला शंका आहे, असं विधान संजय शिरसाठ यांनी केले आहे. त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. काय म्हणाले संजय शिरसाठ? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा खून झाला असावा. तो जिवंत असण्याविषयी मला डाऊट आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पण तो सापडत नाही. त्यामुळे मला अशी शंका येत आहे. प्रस्तुत प्रकरणात सरकार कुणालाही सोडणार नाही. याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे नाव अद्याप समोर आले नाही. पण त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही, पण तपासात थोडे जरी आढळून आले तर कारवाई केली जाईल, असं शिरसाठ म्हणाले. पुढे बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यांना आता माघार घेता येत नाही. पण आम्ही छावासारखे लढलो. आम्हाला काल छावा चित्रपट पाहण्यासाठी जाता आले नाही. केवळ अदिती तटकरे यांनी बोलावले म्हणून आम्ही गेलो नाही असे काहीही नाही. आमच्यापैकी अनेकांनी हा चित्रपट पाहिला होता. त्यामुळेही अनेकजण त्यासाठी गेले नव्हते. शिवसेना त्यांना झेंडू बामचा तडका देईल ओवैसी असो किंवा अबू आझमी, हे लोक समाजात विष कालवण्याचे काम करत आहेत. शिवसेना त्यांना झेंडू बामचा तडका देईल. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कुणी बेताल विधाने करत असेल तर त्याला लोकशाही पद्धतीने काय शिक्षा होऊ शकते हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा देखील संजय शिरसाठ यांनी दिला. यांनीही व्यक्त केला आहे संशय यापूर्वी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळेची हत्या करण्यात आली आहे. तो जिवंत नाहीये, असा दावा केलेला आहे. त्याचबरोबर आमदार सुरेश धस यांनीही त्यांच्या जिवंत असण्याबद्दल शंका व्यक्त केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील कृष्णा आंधळे जिवंत नाहीये. त्याची हत्या झालीय, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.