प्रभात वृत्तसेवा पौड – ताम्हिणी घाट (जि. रायगड) हद्दीत पुण्यातील सहा तरुणांची थार मोटार ताम्हिणी घाटातील सुमारे 500 ते 1000 फूट खोल दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. मध्यरात्री झालेल्या या अपघातात सर्व तरुणांचा मृत्यू झाला असून, जखमी अवस्थेत एकही जण सापडलेला नाही. दरी अतिशय खोल आणि परिसर निर्जन असल्याने अपघात रात्रीच्यावेळी कुणाच्याही लक्षात आला नाही. गुरुवारी (दि. 20) ड्रोनच्या मदतीने शोध घेताना थार मोटार आणि मृतदेह दिसून आल्यानंतर बचावकार्यात वेग आला. अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये शहाजी चव्हाण (वय 22, रा. कोंढवे धावडे), तसेच पुनित सुधाकर शेट्टी (वय 20), साहील साधू बोटे (वय 24), महादेव कोळी (वय 18), ओंकार सुनील कोळी (वय 18), शिवा अरूण माने (वय 19, सर्व रा. कोपरे, पुणे) यांचा समावेश आहे.सोमवारी (दि. 17) रात्री 11.30 वाजता थार (एमएच 12 वायएन 8004) घेऊन हे सर्व मित्र उत्तमनगर, पुणे येथून कोकण प्रवासासाठी निघाले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटल्याने नातेवाईकांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि लोकेशनच्या आधारे ताम्हिणी घाट परिसरात शोधमोहीम राबवली. ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर ड्रोनद्वारे शोध घेताना दरीत थार मोटार दिसून आली. तातडीने माणगाव पोलीस, रायगड व मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथके, शेलार मामा रेस्क्यू टीम, पुणे रेस्क्यू टीम, तसेच ग्रामस्थांनी बचाव मोहीम सुरू केली. तीन मृतदेह वर काढण्यात आले असून उर्वरित तीन मृतदेह सापडले असून ते दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज मुळशी तालुका सीमा संपल्यानंतर लगेच सुरू होणारा ताम्हिणी घाट अतिशय तीव्र वळणांचा आहे. रायगड जिल्ह्यातील कोंडेथर गावानंतर मिळणार्या पहिल्याच वळणावर वाहनाचे नियंत्रण सुटून ते थेट दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घाटात अपघातप्रवण ठिकाणे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बलकवडे, शेलार मामा, अंकुश ढमाले आणि माजी सरपंच संदीप बामगुडे यांनी सांगितले -ताम्हिणी घाटातील वळणे अतिशय धोकादायक आहेत. खोल दर्या, घनदाट जंगल आणि अंधारामुळे अपघाताचा धोका वाढतो. सध्याची रेलिंग्स पुरेशी नाहीत; येथे जाड भिंती, वेग नियंत्रणासाठी गतीरोधक आणि प्रतिबंधात्मक सूचना फलक अत्यावश्यक आहेत.