औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचे नामांतर होणार, पालकमंत्र्यांनी दिली माहिती

छत्रपती संभाजीनगर- औरंगजेबाची कबर असलेले खुलताबादचे नाव रत्नपूर होते. औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. खुलताबादचे नामांतर होणार असून दौलताबादचे देखील नामांतर होणार आहे, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
शिरसाट म्हणाले, औरंगजेबाने त्याच्या काळात जे काही कारनामे केले आहेत त्यामुळे अनेक शहरांची नावे बदलली. धाराशिवचे नाव बदलले गेले. नगरचे नाव बदलले गेले. हे सगळे ‘बाद’ ‘बाद’ आहे ना त्यांची नावे बदलण्याची प्रोसेस आम्ही करत आहोत. औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी हिंदुत्वावादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले. नागपूरमध्ये दंगल देखील झाली. यानंतर आता औरंगजेबांची कबर असणाऱ्या तालुक्याचे नाव बदलणार असे त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला वाढीव निधीसाठी प्रयत्न करू. आम्ही 1200 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र जिल्हावार्षिक योजनांच्या निधीला कट लागला आहे. त्यामुळे अपेक्षित निधी मिळाला नाही. त्यामुळे आता पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून वाढीव निधी मागितला जाणार आहे. एप्रिलमध्ये पूर्ण होणारी योजना अद्याप अपूर्ण आहे. सध्या नागरिकांना दहा ते पंधरा दिवसांआड पाणी मिळत आहे. डिसेंबरपर्यंत योजना पूर्ण न झाल्यास लोक त्यांना जोड्याने मारतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
खैरेंसाठी आमची दारे उघडी
विधानसभा निवडणुकीत बाहेरील लोक आले आणि तिकीट मिळवून निवडणूक लढले. हरल्यानंतर ते परत जातील हे खैरे यांच्या तेव्हा लक्षात आले असेल. यातून त्यांनी आपल्याला मदत केली असू शकते. विरोधी पक्षनेते पदाचा अचानक लाभ झाल्यामुळे आमदार दानवे यांना घमेंड आल्याची टिपणी मंत्री शिरसाट यांनी केली.





