Khed News – खेड तालुक्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेस गती देण्यासाठी उडठ निधीतून यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदार बाबाजी काळे यांनी महाराजस्व समाधान अभियानाच्या आढावा बैठकीत दिले. खेड तालुक्यात ‘महाराजस्व समाधान अभियान’ राबविण्यात येत असून त्याअंतर्गत मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी तालुकास्तरावर प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार बाबाजी काळे बोलत होते. बैठकीस प्रांताधिकारी अनिल दौडे, तहसीलदार प्रशांत बेडसे, खेड बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, जिल्हा परिषद सदस्य गणेश आरगडे, विनया मुंगसे, तनुजा घनवट, दिप्ती भोगाडे, चाकण नगराध्यक्षा मनीषा गोरे, राजगुरुनगर नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आमदार काळे म्हणाले की, ही योजना राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना असून शेतकर्यांना त्यांच्या शेतापर्यंत सर्व हंगामात पोहोचता यावे हा तिचा मुख्य उद्देश आहे. योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांचे रुंदीकरण, मुरूम टाकणे, मजबुतीकरण तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक कामे केली जातात. त्यामुळे शेतीकाम, पिकांची वाहतूक आणि कृषी अवजारांची ने-आण अधिक सुलभ होते. यावेळी त्यांनी एक अभिनव संकल्पना मांडत खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहती व कारखान्यांशी समन्वय साधून त्यांच्या उडठ निधीतून जेसीबी व पोकलेंडसारखी यंत्रसामग्री उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव ठेवला. यामुळे रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण होतील व शासनावरील आर्थिक ताण कमी होईल, असे त्यांनी नमूद केले. यंत्रसामग्रीसाठी लागणारा इंधन खर्च स्थानिक ग्रामपंचायत किंवा संबंधित बांधकाम विभागाकडून करता येईल, तसेच यंत्रांची देखभाल व दुरुस्ती स्थानिक पातळीवर शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार बाबाजी काळे यांच्या या लोकहिताच्या प्रस्तावाचे उपस्थित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी स्वागत केले. या उपक्रमामुळे खेड तालुक्यातील अधिकाधिक शेतकर्यांना शेत पाणंद रस्ते योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.