Ketan Agrawal Murder: सुपारी दिली नाही, कारण…; सिया अन् चेतनने स्वतःच केतनचा खून का केला? तपासात धक्कादायक खुलासा
Ketan Agrawal Murder: तंत्र चौकशीत उत्तरांची झाली होती 'स्क्रिप्टेड' मॅचिंग; पोलिसांनी चालवली मानसिक रणनीती अन् आरोपी चेतन चौधरीचा आत्मविश्वास कोसळला.

Ketan Agrawal Murder: – केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांनी पारंपरिक पोलिसी खाक्याऐवजी मानसशास्त्रीय चौकशी, घटनास्थळावरील वैज्ञानिक तपास आणि तांत्रिक पुराव्यांचा प्रभावी वापर केला. आरोपी चेतन चौधरी, सिया गोयलशी स्वतंत्र संवाद साधत त्यांच्या वर्तनाचा, हावभावांचा आणि मानसिक प्रतिक्रियांचा अभ्यास केला. विश्वासाचे वातावरण निर्माण करून विचारलेल्या प्रश्नांमुळे दोघांचाही नियोजनबद्ध हत्येचा कट उघडकीस आला.
ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतनचा दरीत पडून मृत्यू झाल्यावर त्याची नियोजीत वधू सियाने सेल्फी काढताना तोल जाऊन तो दरीत पडल्याची माहिती दिली होती. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अपघाती मृत्यू होण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. तपासावेळी केतनच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना ६ जून रोजी बालीला जाताना त्याचा पासपोर्ट हरवल्याची माहिती समोर आली.
याचा आणि मृत्यूचा काही संबंध आहे का, या दृष्टीनेही तपास केला. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाने लोहगडावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये तब्बल ३३ अंश सेल्सिअस तापमानात हुडी घालून फिरणारा एक तरुण आढळला. त्याच्या हालचालींचा माग काढल्यानंतर तो चेतन चौधरी असल्याचे स्पष्ट झाले आणि तपासाला निर्णायक दिशा मिळाली. याच्या आधारे २३ जून रोजी चेतन चौधरीला अटक केली, तर दुसऱ्या दिवशी सियाला ताब्यात घेतले.
चौकशीत दोघांना स्वतंत्रपणे प्रश्न विचारले. यावेळी त्यांच्या उत्तरांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य आढळल्याने त्यांनी आधीच बचावाची तयारी करून ठेवल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पथकाने मानसशास्त्रीय पद्धतीने चौकशी सुरू केली. आरोपींच्या बोलण्याची शैली, हावभाव, मानसिक प्रतिक्रिया आणि उत्तरांतील विसंगतींचा बारकाईने अभ्यास करत प्रश्न विचारले. चौकशीतील मानसिक दबावामुळे दोघांचाही बनाव कोसळला आणि खुनाचे नियोजन उघड झाले.
म्हणून स्वत: केला खून
आरोपींनी गुन्ह्याचे संपूर्ण नियोजन आधीच केल्याचे समोर आले. अपघाती मृत्यूचा बनाव कसा उभा करायचा आणि चौकशीला कसे सामोरे जायचे, याची तयारी त्यांनी आधीच केली होती. गुन्ह्याची माहिती तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू नये आणि कोणताही बाह्य सहभाग राहू नये, यासाठी सुपारी न देता स्वतःच हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





