नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी हे खूपच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसने कर्नाटकात जे केले, त्याचीच पुनरावृत्ती मध्य प्रदेशात होईल असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केलाय.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सोमवारी पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत एआयसीसी मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ आदी नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी मध्यप्रदेशात १५० जागा जिकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी सर्व प्रमुख नेत्यांसोबत राहुल गांधीनी बातचीत करून आगामी काळात निवडणुकांवर चर्चा केल्याचे समजते. काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आगामी काळात काय करावे यावर देखील यावेळी चर्चा झाल्याचे समजते. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि ग्राऊंडवरील फळी मजबूत करण्यासाठी काँग्रेस आणखी जोमाने प्रयत्न करणार असलयाचे सांगितले जात आहे.