Karad (संजय पाटील ) : भारत- बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून सातारा जिल्ह्यातील कराडलगतच्या मुंढे गावात राहणाऱ्या तिघा बांगलोदशी नागरिकांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या करण बापू कांबळे (वय 29, सध्या रा. मुंढे, ता. कराड, मूळ रा. किवळ, ता. कराड) याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बिलाल सलालउद्दीन मोल्ला, आयेशा अदिल शेख, नसरिन अब्दुलसालाय मोल्ला (सर्वजण मूळ रा. बांगलादेश) अशी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे. कसा लागला शोध ? याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सध्या भारतात बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्यावरून मोठा गदारोळ पाहण्यास मिळत आहे. त्याच अनुषंगाने कराडच्या पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना मुंढे येथे एका इमारतीत बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत, अशी माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मगदूम यांनी आपल्या टीमसह मुंढे येथे सह्याद्री रेसिडेन्सी नावच्या इमारतीजवळ जाऊन बिलाल मोल्ला याच्याकडे विचारपूस केली असता तो व आणखी तिघेजण हे सहा महिन्यापासून येथे वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. मुंबईतून घेतले बनावट आधारकार्ड – त्यांच्याकडे कसून विचारपूस केली असता त्यांनी मुंबई येथे बनावट पत्त्याचे आधारकार्ड तयार करून घेतले असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून मुंढे येथील सह्याद्री रेसिडेन्सी येथील चौथ्या मजल्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. त्यातील तिघा बांगलादेशी नागरिकांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. या बांगलादेशी नागरिकांना वास्तव्य देणाऱ्या मुंढे येथील करण बापू कांबळे याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.