प्रभात वृत्तसेवा कामशेत – कामशेत परिसरात सध्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, एकीकडे अशुद्ध व गढूळ पाणी नळाद्वारे पुरवले जात असताना दुसरीकडे पाईपलाईनमधील गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोग्याच्या समस्यांची भीतीही वाढत आहे. कामशेत हे सुमारे वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचे शहर असून पुणे-मुंबई महामार्गालगत वसलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी नोकरदार, व्यापारी, मजूर आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. मात्र इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी आवश्यक असलेला शुद्ध पाण्याचा पुरवठा सध्या पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. इंद्रायणी कॉलनी, सहारा कॉलनी, गरुड कॉलनी, देवराम कॉलनी, आदर्श कॉलनी आदी भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. काही ठिकाणी पाण्यातून कचरा, घाण आणि गाळ येत असल्याने नागरिकांना ते पाणी वापरणेही अशक्य झाले आहे. फिल्टर योजना नादुरुस्त कामशेत गावात पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर योजना राबवण्यात आली आहे. मात्र ही योजना व्यवस्थित सुरू नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. फिल्टर प्लांट पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्यामुळे नळाद्वारे येणारे पाणी शुद्ध न होताच घराघरांत पोहोचत आहे. परिणामी अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खासगी पाण्याच्या कॅनवर अवलंबून राहावे लागत आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, ग्रामपंचायतीच्या अपयशाचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. नवीन पाईपलाईन असूनही गळती ग्रामपंचायतीच्या वतीने काही भागात लाखो रुपये खर्च करून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र या नवीन पाईपलाईनमध्ये अनेक ठिकाणी लिकेज असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पाईपलाईनमधून सतत पाणी गळत असल्यामुळे दररोज हजारो, तर महिन्याला लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकताना जुन्याच पाईपचा वापर करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.