Kalyan News : पेढे वाटा पेढे.! मराठी माणसांवरील हल्लेखोरांना मुख्यमंत्री कार्यालयाचे समर्थन; ‘सामना’तून महायुतीवर टीकेचा बाण

Kalyan News । Saamna Editorial : मुंबईतील कल्याण येथील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत हिंदी भाषिक व्यक्तीकडून मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत आरोपी अखिलेश शुक्ला यांच्यासह दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच, दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून, अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. तसेच, विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले आहे.
दरम्यान, अश्यातच आता शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून ‘सामना’ मुखपत्रातून तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे. ठाकरी शैलीमध्ये या संपूर्ण कृत्याचा समाचार घेत अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवरही निशाणार साधण्यात आला आहे. “मिंध्यांनो, पेढे वाटा! अशा मथळ्याअंतर्गत सामनातील अग्रलेख लिहिण्यात आला असून, घडल्या कृत्यावर कठोर भूमिका मांडत सक्तीच्या कारवाईची मागणी केली आहे.
काय आहे सामनातील अग्रलेख? पाहा….
‘कल्याणच्या उच्चभ्रू वस्तीत कोणी अखिलेश शुक्ला नामक उपऱ्याने गुंड टोळ्यांच्या मदतीने मराठी कुटुंबावर हल्ला केला. मराठी माणसे मच्छी-मटण खातात, ती घाणेरडी आहेत या सबबीखाली शुक्ला व त्याचे गुंड कल्याण परिसरात झुंडशाही करतात आणि फडणवीसांचे पोलीस त्या शुक्लासमोर नांगी टाकतात. हा जो कोणी शुक्ला आहे, तो महाराष्ट्राच्या मंत्रालयात काम करतो व मंत्रालयाचा अधिकार वापरून पोलिसांवर दबाव आणतो. त्यामुळे रक्तबंबाळ मराठी कुटुंबाची फिर्याद घ्यायला फडणवीसांचे पोलीस तयार नाहीत.
“मला हात लावाल तर याद राखा, मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला फोन येईल,” अशी धमकी हा शुक्ला देतो. म्हणजे मराठी माणसांवरील हल्ल्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे समर्थन आहे असे समजायचे काय? मराठी माणूस माझ्यासमोर झाडू मारतात, अशी गुर्मीची मस्तवाल भाषा करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. त्यास मोदी-शहा-फडणवीस यांचे महाराष्ट्र कमजोर करण्याचे धोरण कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीच या त्रिकुटाने शिवसेना फोडली.
मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली व मराठी माणसाला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी शिवसेना लढे देत राहिली. त्या लढवय्या वृत्तीनेच मुंबई व मराठी माणूस टिकून राहिला, पण मोदी- शहांना मुंबई अदानीच्या घशात घालायची आहे व शिवसेना आहे तोपर्यंत हा डाव यशस्वी होणार नाही, म्हणून शिवसेना तोडण्याचे कारस्थान तडीस नेले. त्यामुळे मुंबईतील सर्व संपत्ती आता अदानी व इतर उपयऱ्यांना सहज हडप करता येईल. फडणवीसांचे सरकार हा काही लोकमताचा कौल नाही’ असं या अग्रलेखात लिहिलं गेलं.
नेमका वाद काय?
कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत अखिलेश गुप्ता व अभिजित देशमुख हे दोघेही राहतात. अखिलेश यांच्या पत्नी देवपूजा केल्यानंतर धूप लावतात. धूपाचा धूर घरात जात असून, यामुळे त्रास होत असल्याचे सोसायटीतील वर्षा कळवीकट्टे यांनी अखिलेश यांच्या पत्नीला सांगितले. मात्र, याचे रुपांतर वादात झाले.
यावेळी याच सोसायटीत राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी अखिलेश यांनी 7-8 जणांना बोलवून अभिजित देशमुख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, शिवीगाळ करत धमकी दिली. या घटनेत अभिजित देशमुख जखमी झाले आहेत. या प्रकरणात दोन्ही पक्षाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता अखिलेश शुक्ला यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मनसे व शिवसेनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हिवाळी अधिवेशनात याप्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.





