नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या, एकमेकांवरील आरोपांच्या फैरींमुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित व कॉंग्रेसचे माजी मंत्री के.सी.पाडवी यांच्यात चांगलाच कलगीतूरा रंगल्याने, दोन्ही बाजूंनी चिखलफेक करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी गावितांनी कॉंग्रेस व शिंदेसेनेवर टीका केली होती. त्याला के. सी पाडवींनी जोरदार उत्तर देताना विजयकुमार गावित यांना सर्वात भ्रष्ट माणूस असे म्हटले आहे. कोणत्याही कॉंग्रेस किंवा शिंदेसेनेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तुम्हाला त्रास दिला तर त्यांना थेट माझे नाव सांगा. मी तुमच्यासोबत आहे. कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. शिवसेना व कॉंग्रेसचे नेते चोर आहेत, असे विधान डॉ. गावित यांनी केले होते. त्याला कॉंग्रेसचे नेते के. सी पाडवी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाडवी म्हणाले की, आमदार असलेले गावित हे माजी मंत्री आहेत, ते किती वर्ष सत्तेत होते, हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. त्यांनी २००४ ते २००९ या काळात, आदिवासी खात्यात जो भ्रष्टाचार केला होता, त्यामुळेच अजूनही प्रत्येक आश्रम शाळेत साहित्य सडत पडलेले आहे. त्यामुळेच शासनाने डॉ. गवित यांच्या विरोधात गायकवाड समितीची स्थापना केली आहे. त्याचा खटला उच्च न्यायालयात सुरु असून त्यांच्यावर तब्बल सहा हजार कोटींच्या भ्र्ष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे हा जिल्ह्यातील सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारा माणूस आहे, असे पाडवी म्हणाले. पाडवी पुढे म्हणाले की, त्यांनी नाशिकमध्ये २०० वस्ती असलेल्या गावामध्ये ८०० मंगळसुत्रांचे वाटप केले होते. याची सर्वांनाच माहिती आहे. हा माणूस भ्रष्टाचार केल्याशिवाय जगूच शकत नाही. त्यांची भ्रष्टाचार करण्याची एक पद्धत असून, त्यामुळेच एक खिडकी योजनेचे नाव तीन खिडकी पडले आहे. एवढे करून देखील ते पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाषण करत फिरत आहेत, ते आम्हाला चोर म्हणत आहे, मात्र, ते किती मोठे चोर आहेत, हे पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे, असे म्हणताना पाडवी यांनी डॉ. गवित यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.