Jejuri News – मंदिर संस्कृतीचे उपासक असलेल्या भारतीय गुरव समाज बांधवांनी प्रलंबित मागण्यांसाठी मोठा एल्गार पुकारला आहे. या मागण्यांसाठी मंगळवारी मुंबईतील आझाद मैदान आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा गडावर गुरव समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. खंडोबा देवाचे दर्शन घेऊन महाअभिषेक करण्यात आला. खंडोबाची पवित्र महातलवार (खंडा) हाती घेत आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला. भारतीय गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक शीतल शिंदे, जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई आणि संभाजीनगरच्या नगरसेविका अर्चना नीलकंठ यांच्या उपस्थितीत आंदोलनाची घोषणा करण्यात आली. यावेळी “जय गुरव”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पांडे, डॉ. मीनाक्षी पुजारी, सदानंद बारभाई, भाग्यश्री भालेराव, डॉ. रंगनाथ गुरव, ज्योती क्षीरसागर, माधव बारभाई, ऋषिकेश सातभाई, भाग्यश्री बारभाई आदी मान्यवरांसह परराज्यातून गुरव संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, जेजुरीच्या खंडोबा गडावर नेहमीच राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या गुरव समाजाच्या कार्यकर्त्यांमुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता. शेकडो वर्षांची मंदिर सेवा परंपरा जपणाऱ्या गुरव समाजाला शासनाने न्याय न दिल्यास शेकडो तुताऱ्या घेऊन पुन्हा एकदा आझाद मैदानावर एल्गार पुकारला जाईल, असा इशारा डॉ. रंगनाथ गुरव यांनी दिला. काय आहेत मागण्या… मुंबईतील आंदोलनात गुरव समाजाच्या प्रलंबित मागण्या शासनापुढे मांडल्या जाणार आहेत. त्यात राज्यातील मंदिरांमध्ये ट्रस्टी मंडळात गुरव समाजाला ५० टक्के प्रतिनिधित्व देणे, देवस्थान जमिनींच्या प्रकरणात वर्ग-३ वतन खालसा करणे, जमिनींचा फेरसर्व्हे करणे, बेकायदेशीर हस्तांतरण रद्द करणे, मूळ सनदधारकांना ताबा देणे, बेकायदेशीर कुळे हटवणे, सार्वजनिक कामांसाठी घेतलेल्या जमिनीचा योग्य मोबदला देणे तसेच वारसा नोंद प्रक्रिया सुरू करणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.