पुणे – 2019 लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागणार आहे.
गेल्या दहा दिवसात पेट्रोलचे दर कमी झाले होते. परंतु निकालाचा दिवस समीप येताच मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होण्याची चिन्हं आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, “काही दिवसांपूर्वीच मी असे बोललो होतो की 19 तारखेला निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यावर त्वरित पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील. त्याप्रमाणे आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत”. निवडणुकांसाठी आणि निवडणुकांपुरतेच सर्व काही हेच नरेंद्र मोदी सरकारचे धोरण आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.