Jagdeep Dhankhar : माजी उपराष्ट्रपती डाॅ. जगदीप धनखड यांनी राजीनाम्याचे सत्य सांगावे; काँग्रेसने केली मागणी

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती डाॅ. जगदीप धनखड यांनी आपले पद सोडले, त्याला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. प्रकृतीच्या कारणासाठी त्यांनी आपले पद सोडले नसून, त्यामागची कारणे अधिक सखोल असावीत. म्हणून केंद्र सरकारने धनखड यांच्या राजीनामा प्रकरणातील सत्य सांगावे अशी मागणी काॅंग्रेसने केली आहे. धनखड हे स्पष्टवक्ते होते आणि कोणाचाही मुलाहिजा ते बाळगत नसत.
उपराष्ट्रपती जेव्हा राजीनामा देतात, तेव्हा त्यांच्यासाठी साधा निरोप समारंभही आयोजित केला गेला नव्हता, असे सांगून काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रभारी संपर्क जयराम रमेश म्हणाले की, राजीनामा दिल्यानंतर १०० दिवसांपासून ते पूर्णपणे गप्प आहेत आणि त्यांच्या सर्व पूर्वसुरींप्रमाणे किमान निरोप समारंभाची आवश्यकता आहे. २१ जुलै रोजी रात्री उशिरा, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला.
जरी ते दिवसरात्र पंतप्रधानांचे गुणगान गात होते; पण राजीनामा देण्यास भाग पाडले गेले असावे. दररोज बातम्यांमध्ये राहणारे धनखड अचानक शांत झाले आहेत, यावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते सतत आणि अन्याय्यपणे विरोधी पक्षाची टीका करत असत. तरीही, लोकशाही परंपरांनुसार, त्यांना निरोप द्यायला हवा होता.
अशी घडली होती घटना…
७४ वर्षीय धनखड यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पदभार स्वीकारला आणि त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. ते राज्यसभेचे अध्यक्ष देखील होते आणि त्यांचा राजीनामा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आला. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या घटनात्मक कार्यकाळात, धनखड यांचे विरोधकांशी अनेक वेळा वाद झाले. त्यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव देखील मांडला होता.





