“घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही”; RSS नेत्याचे विधान वादाच्या भोवऱ्यात

Bhaiyyaji Joshi | मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात देशाच्या विविध भागातून लोक येतात. कर्मभूमी म्हणून मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मात्र अनेकदा मराठी माणूस आणि परप्रांतीय यांच्या मुंबईत राहून मराठी आलीच पाहिजे यावरून वाद झाल्याचेही पाहायला मिळाले. यातच आता महाराष्ट्रात RSS चे ज्येष्ठ नेते आणि माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी भाषेबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलं पाहिजे असं नाही, असं वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले आहे.
विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना मुंबईतील विविधतेतील भाष्य केले. “मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे, असे नाही, ” असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले आहे.त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्वयंसेवक नावाची ही शक्ती….
पुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज असे एक मात्र राजा आहेत, ज्यांना श्रीमंत योगी म्हणतात. असे महापुरुष स्वतःला अहंकारापासून मुक्त करण्यासाठी आपण जे कार्य करतो ते ईश्वराचे कार्य आहे, असं म्हणतात. म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, असे शिवाजी महाराज म्हणायचे. संघाच्या शाखेत काम करणारा प्रत्येक जण ईश्वरी कार्य करत आहे. स्वयंसेवक नावाची ही शक्ती आहे. त्या शक्तीच्या रूपाने प्रत्येक जण काम करतो. असेच आपले जाम साहेब होते. जे स्वतःसाठी जगतात ते पशु समान असतात आणि दुसऱ्यासाठी जगतात ते खरे आयुष्य जगतात आणि त्यांनाच मनुष्य म्हणावं,” असेही ते म्हणाले. Bhaiyyaji Joshi |
दरम्यान, मुंबईत गेल्या काही काळात मराठी भाषेला आणि मराठी भाषिकांना डावलण्याचे प्रकार समोर आले आहेत. मुंबई परिसरात मराठी माणसांविरोधातील या प्रकारावर मनसे, शिवसेनासारख्या राजकीय पक्षांनी आवाजही उचलला होता. Bhaiyyaji Joshi |
– अंधेरीतील एका कंपनीने नोकरीची जाहिरात देताना मराठी माणसाला नोकरी नाही असं प्रसिद्ध केले होते, त्यावरून वाद झाला.
– मुलुंडमध्ये एका सोसायटीने मराठी महिलेला घर नाकारले होते.
– कल्याणमध्ये शासकीय सेवेत काम करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने मराठी कुटुंबाला मारहाण केली होती.
– घाटकोपर भागातील गुजराती सोसायटीत मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यापासून रोखल्याचा आरोप झाला होता. यावरून वाद असतानाच आता भैय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानाने मराठी भाषिकांमध्ये संताप पसरला आहे.
हेही वाचा :
अमेरिकेने भारतावर “रेसिप्रोकल टॅरिफ” लादले ; परराष्ट्र मंत्री म्हणाले,” जो विचार केला तसंच…”





