Supriya Sule – दिवंगत नेते अजित पवार यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे, राष्ट्रवादी(शप) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे या नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, आम्ही एकमेकांना आधार देत आहोत आणि पुढे जात आहोत. दादा (अजित पवार) आता राहीले नाहीत, त्यामुळे मला जुन्या गोष्टी पुन्हा सांगायच्या नाहीत. आमच्यात ज्या काही चर्चा झाल्या होत्या त्या अजूनही आहेत. त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना फायदा झाला तर सर्वांना आनंद होईल, परंतु कोणत्याही व्यापार करारातून भारताला काय फायदा होईल. सरकारने पारदर्शकपणे लोकांना सत्य सांगावे. अजित पवारांच्या काळात कृषी आणि कृषी-आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांद्वारे ५०० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. पुण्यात यशस्वी झालेल्या कृषक उपक्रम हा अजित पवारांचे स्वप्न होते आणि ते योग्यरित्या राबवले पाहिजे,असे सुळे म्हणाल्या. विमान अपघातावर आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सुळे त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर चौकशीचे आश्वासन दिले आहे. रोहित पवार यांची अस्वस्थता स्वाभाविक आहे. काय घडले, ते कसे घडले आणि ते रोखता आले असते का?, असे अनेक प्रश्न आहेत. आपण अहवालाची वाट पाहिली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करणाऱ्या विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांचेही सुळे यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचे त्यांनी सांगितले.