IT Engineer Marriage : आयटीवाला नवरा नको गं बाई…आयटी इंजिनिअर्सची लग्नाच्या बाजारातील क्रेझ संपली? हे आहे कारण
IT Engineer Marriage : कोरोना काळातील 'वर्क फ्रॉम होम'ची लाट ओसरली; पुण्यासह बेंगळुरूमधील आयटीयन्ससमोर लग्नासाठी पसंती मिळवण्याचे नवीन आव्हान.

IT Engineer Marriage – एकेकाळी आयटी क्षेत्रातील नोकरी म्हणजे स्थिर भविष्य, भरघोस पगार आणि परदेशात करिअरची संधी असे चित्र होते. त्यामुळे विवाहासाठी आयटी क्षेत्रातील तरुणांना मोठी पसंती दिली जात होती. मात्र आता परिस्थिती बदलताना दिसत असून “आयटीवाला नवरा नको गं बाई” अशी भावना काही इच्छुक मुली आणि पालकांमध्ये निर्माण होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
एआयमुळे नोकऱ्या जात असल्याच्या चर्चा आणि त्याहून अधिक अफवांनी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. करोना काळात आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध झाल्या होत्या. वर्क फ्रॉम होम संस्कृतीमुळे अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात भरती केली. त्यामुळे अनेक तरुणांनी विविध कोर्सेस, प्रोग्रामिंग प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर कौशल्ये आत्मसात करून आयटी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
पुणे, बेंगळुरू, हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये आयटी क्षेत्राकडे युवकांचा मोठा ओढा वाढला होता. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये जगभरात युद्धजन्य स्िथती, जागतिक मंदी आणि सर्वांत मोठी बाब म्हणजे कृ.ित्रम बुद्धीमत्ता अर्थात एआयने आयटीयन्सची घेतलेली जागा यामुळे नोकरीकपात वाढत असल्याच्या चर्चांनी आयटी क्षेत्रात खळबळ माजविली आहे.
तज्ज्ञांच्या मते, आयटी क्षेत्र अजूनही मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे क्षेत्र आहे. मात्र बदलत्या तंत्रज्ञानामुळे कौशल्य अद्ययावत ठेवणे आवश्यक झाले आहे. एआयमुळे काही पारंपरिक नोकऱ्यांवर परिणाम होत असला तरी नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणाऱ्यांसाठी भविष्यातही संधी उपलब्ध राहतील, असे मत उद्योग क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.
अनिश्चितता वाढली
अनेक तरुणांनी परदेशात नोकरी आणि उच्च पगाराच्या संधींच्या आशेने या क्षेत्रात भविष्य स्थिर करण्याचे स्वप्न पाहिले. विवाह जुळविताना “आयटी इंजिनिअर” हा शब्दच प्रतिष्ठेचा मानला जात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जागतिक मंदी, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि मोठ्या आयटी कंपन्यांकडून होणारी नोकरकपात यामुळे या क्षेत्रातील अनिश्चितता वाढली आहे.
अनेक नामांकित कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे निर्णय घेतल्याने तरुणांमध्ये नोकरीबाबत असुरक्षिततेची भावना वाढली आहे. काही ठिकाणी पगारवाढ थांबली असून नवीन भरतीचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील करिअर पूर्वीसारखे सुरक्षित राहिले नसल्याची चर्चा समाजात सुरू आहे.


