त्रिवेंद्रम :– केरळच्या विझिंजम येथील अदानी बंदर प्रकल्पाच्या विरोधात गेल्या शंभर दिवसांपासून आंदोलन सुरू असून रविवारी रात्री 3 हजार लोकांच्या जमावाने येथील पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करत तोडफोड केली. यात 36 पोलीस जखमी झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले आहे. पोलिसांनी स्थानिकांच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याची आणि अन्य तिघांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी हा हल्ला आणि तोडफोड करण्यात आली आहे. यात काही महिला आणि लहान मुलेही जखमी झाल्याचे वृत्त आहे.
आशियातील सगळ्यांत श्रीमंत उद्योजक असलेल्या गौतम अदानी यांच्याकडून या बंदर प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यात आमच्या उपजिवीकेच्या साधनावर गदा आली असल्याचा आरोप करत स्थानिक मासेमारांनी त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पर्यावरणाच्या नियमांचेही उल्लंघन होत असल्याचा अरोप असून रविवारी आंदोलन चिघळले आणि पोलीस ठाण्यावरच हल्लाबोल झाला.
दरम्यान, नियमांच्या उल्लंघनाचा आरोप कंपनीने फेटाळला आहे. जे काही आरोप केले जात आहेत ते वातावरण बदलाचा परिणाम असल्याचाही त्यांचा दावा आहे. गेल्याच आठवड्यात केरळ उच्च न्यायालयाने प्रकल्पाच्या कामकाजात आडकाठी न आणण्याचे निर्देश स्थानिकांना दिले होते. मात्र तरीही ते पाळले गेले नसून गेल्या आठवड्यात प्रकल्पाकडे एकही वाहन जाऊ देण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. त्याचे संतप्त पडसाद रविवारी रात्री उमटल्याचे पाहायला मिळाले आणि जमावाने पोलिसांशी संघर्ष केला.
पोलिसांच्या वाहनांचे नुकसान करण्यात आले असून अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. या ठिकाणी 900 पोलीस तैनात करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, आम्ही गोंधळ न घालता जात असताना पोलिसांनीच चिथावणी दिल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे. याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर प्रकल्प आता अगदी पुढच्या टप्प्यात पोहोचला असताना त्यांना आता हा प्रकल्पच नको आहे. त्यामुळे त्यांचे काहीही भले होणार नाही अशी भूमिका एका मंत्र्यांनी सरकारची बाजू मांडताना स्पष्ट केली आहे.