प्रेरणादायी बातमी! ‘हे’ आहे संपूर्ण लसीकरण झालेलं देशातील पहिलं गाव; करोनाला गावाने रोखले वेशीवरच

मुंबई : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने मागील दोन-तीन महिन्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. हजारो नागरिकांचा या करोनाने बळी घेतला. दरम्यान, या करोनाला रोखण्यासाठी सरकारकडून लसीकरणाला वेग आल्याने रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. याच लसीकरणात सर्वात आघाडीवर देशातील एक गाव आहे ज्या गावाने संपूर्ण लसीकरण केले आहे. लसीकरण पूर्ण करून या गावाने करोनाला वेशीवर रोखले आहे.
पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी गाव. या गावाने करोनाला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे. त्यांच्या या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे गावातील सगळ्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. अवघे ५४५ लोकसंख्या असलेले गाव. पहिल्यापासून हे गाव करोनामुक्त आहे. त्यातच आता या गावाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. ते म्हणजे या गावातील प्रत्येक नागरिकांनी करोना प्रतिबंधित लस घेतली आहे.
बहिरवाडी गावातील नागरिकांचे ग्रामीण संस्थेच्या माध्यमांतून लसीकरण करण्यात आले आहे. गावातील ३५६ लोकांना कोविशील्डचा पहिला डोस देऊन व्हॅक्सिनेट करण्यात आले आहे. तर गावातील १४२ लहान मुलांना फ्लू ची लस देऊन त्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा उपक्रम दोन दिवसात राबवण्यात आला होता. पहिल्या दिवशी १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी लहान मुलांना फ्लूची लस देण्यात आली.
बहिरवाडी गावाचे १००% लसीकरण झाल्याचा दावा स्थानिक आमदारांनी केला आहे. तर या गावाचे कौतुक खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी केले आहे. बहिरवाडी गावच्या वस्तीवर करोनाने प्रवेश केला होता. मात्र सर्व नागरिकांनी मिळून या करोनाला पळवून लावले असून आता संपूर्ण गावात लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, या उपक्रमानंतर आता गावाची करोनामुक्त गावाच्या योजनेत शिफारस करण्यात येणार आहे.





