India vs Afghanistan T20I Series (Mohali) :- नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली भारताच्या टी-२० संघात तब्बल १४ महिन्यांच्या खंडानंतर परतले आहेत. घरच्या मैदानावर रोहितच्या नेतृत्वाखालील संघ अफगाणिस्तानशी तिन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार असून यातील पहिला सामना आज (गुरुवार) मोहालीत होत आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवणार का या प्रश्नापेक्षा मोठा प्रश्न आहे तो रोहित व कोहली टी-२० क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या खंडानंतर कशी कामगिरी करतात.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
वेळ – संध्याकाळी ७ पासून
ठीकाण – मोहाली
थेट प्रक्षेपण – स्पोर्टस १८
या मालिकेसाठी निवड समितीने रोहित शर्मना व विराट कोहली या प्रमुख फलंदाजांना संघा स्थान देत संघाची ताकद वाढवली आहे. संघाची फलंदाजी या दोन फलंदाजांसह शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जीतेश शर्मा, संजू सॅमसन अशी भक्कम आहे. मात्र, रोहितसह भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी गिल किंवा जयस्वाल यांच्यापैकी कोणाची निवड होणार हे सकाळी खेळपट्टी पाहूनच ठरवले जाणार आहे. गोलंदाजीत अर्शदीप सिंग, आवेश खानसह मुकेश कुमार यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार राहील. मात्र, मालिका भारतात होत असली तरीही हिवाळ्याचे दिवस असल्याने संघात हे तिनही गोलंदाज स्थान राखतील.
फिरकीसाठी कुलदीप यादव व रवी बिष्णोई यांचे पारडे जड राहणार असले तरीही फलंदाजीची क्षमता पाहता बिष्णोईच्या जागी अक्सर पटेलच्या समावेशाची शक्यता जास्त आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी फारशी सरस नसल्याने कदाचित आवेश खानच्या जागी गोलंदाजीसह फलंदाजीही करु शकत असलेल्या शिवम दुबेला स्थान मिळू शकते. यष्टीरक्षक म्हणून जरी जीतेश शर्माची निवड झाली असली तरीही सॅमसनची कामगिरी जास्त सरस ठरली होती, त्यामुळे अंतिम अकरा खेळाडूंत त्याचे स्थान निश्चित होण्याची शक्यताच जास्त आहे.
दुसरीकडे अफगाणिस्तानबाबत बोलायचे झाले तर आयपीएल स्पर्धेत त्यांचे बरेच खेळाडू खेळत असल्याने त्यांना भारतातील वातावरणाची सवय आहे. तसेच अफगाणिस्तान संघाने गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतही अफलातून कामगिरी केली होती. अनुभवी कमी पडल्याने त्यांना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठता आली नाही मात्र, त्यांच्या कामगिरीतून त्यांच्या दर्जाची साक्ष पडली.
हेड टू हेड
एकूण सामने ५
भारत विजय ४
निकाल नाही १
त्यामुळेच ते भारताला भारतातच टी-२० मालिकेतही धक्का देऊन आश्चर्यचकीत करु शकतात. त्यांच्याकडे कर्णधार इब्राहीम झद्रान, रेहमत शाह, रेहमनुल्लाह गुरबाज, अजमतुल्लाह ओमरझाई असे तुल्यबळ फलंदाज आहेत. गोलंदाजीत त्यांचा अनुभव कमी असला तरीही नूर अहमद, नवीन उल हक गुलबदीन नईब असे चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत.
रोहीत व कोहलीची विश्वकरंडकासाठी सज्जता
या मालिकेद्वारे रोहित व कोहली आगामी काळात होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करतील. त्यासाठीच त्यांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांचा अनुभव मिळावा म्हणूनच त्यांची या मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. ते तब्बल १४ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर टी-२० संघात पुनरागमन करत असल्याने त्यांच्यावर कामगिरीचे दडपण राहणार आहेच मात्र, त्यात ते यशस्वी ठरले तर आगामी विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या विजेतेपदाची दावेदारीही भक्कम होणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्यानंतर आयपीएल स्पर्धा होणार आहे. त्यानंतर जुन महिन्यात वेस्ट इंडिज व अमेरिकेत टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे.
IPL 2024 : भारतात यावर्षी आयपीएल होणार नाही? समोर आलं ‘हे’ मोठं कारण…
लक्षवेधी
– कोहली १२ हजार धावांच्या उंबरठ्यावर
– कोहलीला ३५ धावांची गरज
– रोहितला ४ हजार धावा पूर्ण करण्याची संधी
– त्याला १४७ धावांची गरज
– टी-२० मध्ये सर्वाधिक षटकारांचीही रोहितला संधी
– अवघ्या ५ षटकारांची गरज
रशीद खान मालिकेला मुकणार
अफगाणिस्तानचा प्रमुख लेगस्पीन गोलंदाज व उपयुक्त फलंदाज रशीद खान दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेला मुकणार असल्याचे समोर आले आहे. त्याला गेल्या मोसमापासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त केले आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी सराव सत्रातही त्याला त्रास होऊ लागल्याने त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यात तो आगामी टी-२० विश्वकरंडक डोळ्यासमोर ठेवत ही मालिका खेळण्याचा धोका पत्करणार नाही असेच समोर येत आहे.