इंदोरीकरांनी 25 वर्षांत अनेक चालीरीती बंद केल्या : ना. थोरात

संगमनेर – इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याच समर्थन करता येणार नाही. मात्र गेल्या 25 वर्षांत त्यांनी केलेल्या प्रबोधनाच्या कामामुळे अनेक चुकीच्या चालीरीती बंद झाल्या. ते आज चालवीत असलेली शाळा असेल किंवा समाज प्रबोधन काम योग्य असल्याच सांगत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी इंदुरीकर महाराजांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला असला तरी समर्थन करणार नाही, असेही स्पष्ट केले.
सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकरांनी एका कीर्तनात केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर चहूकडून चौफेर टीका होत आहे. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर ना. थोरात यांनी भाष्य केलं आहे. माझी आणि त्यांची चांगली ओळख असल्याचेही त्यांनी संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महसूल विभागात अर्धन्यायिक काम अनेक पातळीवर चालते मात्र कामाच ऑडिट करण्याची पद्धत नाही. ऑडिट नसल्यानं चुकीच्या निर्णयाचा फटका सामान्य जनतेला बसतो. यापुढे महसूल विभागात ऑडिट करून शिस्त आणणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. कोणताही तपास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलीस दलाची आहे.
परंतु केंद्राकडे तपास देताना एकत्रित विचार करणे गरजेचे. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मात्र आम्ही त्यावर एकत्रित चर्चा करणार आहे. महाविकास आघाडीवर कुठेही धक्का लागणार नाही. आमचं सरकार किमान समान कार्यक्रम घेऊन काम करत आहे. कधी कधी काही असे मुद्दे आमच्यासमोर निर्माण होतात. यावर एकत्रित बसून आम्ही मार्ग काढत असतो असेही थोरातांनी यावेळी स्पष्ट केले.





