बहारिन: जगासमोर भारताने आपले सामर्थ्य दाखवले आहे. भारत आज जगामध्ये चमत्कार करत आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित आहेत. भारताची प्रतिभा ही जागतिक ओळख आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे.
बहारिनमध्ये मोदींनी आज भारतीय समुदायाला संबोधित केले.
मोदी म्हणाले की, पुढच्या पाच वर्षात अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट करायचे भारताने ठरवले आहे. भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाल्यास प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल, असेही ते म्हणाले. इन्फ्रास्टक्चरचे जाळे उभारण्याचे भारतामध्ये मोठे काम सुरु आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याची भारतामध्ये क्षमता आहे आणि प्लानही आहे. भारतातील बहुतांश कुटुंब बॅंकिंग सेवेशी जोडलेली आहेत. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट आहे. 50 कोटी भारतीयांना देशात मोफत उपचार मिळतात. आता भारतीयांचा आत्मविश्वास उंचावला आहे, असे ते म्हणाले.
बहारिनमध्ये भारतीयांनी त्यांच्या मेहनतीने स्वत:ची जागा बनवली आहे. बहारिनचे सत्ताधारी तुमचे कौतुक करत असताना अभिमानाने माझा ऊर भरुन येत होता. बहारिनला येणारा मी पहिला पंतप्रधान ठरलो हे माझे भाग्य आहे. इथे येऊन मला भारतात असल्यासारखे वाटत असल्याचे देखील ते म्हणाले. बहारिनचे न्यू इंडियामध्ये स्वागत आहे. दोन्ही देशांना परस्पराकडून भरपूर काही मिळाले आहे, असेही ते म्हणाले.