क्रयशक्ती नुसार भारताची अर्थव्यवस्था 15 लाख कोटी डॉलरची; निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – जागतिक बाजारातील किमतीनुसार म्हणजे मार्केट प्राइसनुसार भारताची अर्थव्यवस्था सध्या चार लाख कोटी डॉलरची असल्याचे समजले जाते. या हिशोबाने भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकाची असल्याचे वृत्त माध्यमात सांगितले जाते. मात्र चलनाच्या क्रयशक्तीच्या हिशोबाने म्हणजे परचेसिंग पावर पॅरिटीनुसार भारताची अर्थव्यवस्था आताच तब्बल 15 लाख कोटी डॉलरची आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था 29 लाख कोटी डॉलरची समजली जाते. त्या हिशोबाने भारताची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या निम्मी भरते असे स्पष्टीकरण नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी केले आहे.
क्रयशक्ती नुसार म्हणजे परचेसिंग पावर पॅरिटी नुसार भारतीय चलनात जेवढ्या वस्तू आणि सेवा मिळतात तेवढ्याच वस्तू आणि सेवासाठी किती डॉलर लागतील असा हिशेब आहे. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था तब्बल 15 लाख कोटी डॉलरची म्हणजे 15 ट्रिलियन डॉलरची भरती असे त्यांनी सांगितले. भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या जागतिक बाजारभावानुसार विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचे मूल्यांकन केले जाते. मात्र प्रत्यक्षात परचेसिंग पावर पॅरिटीनुसार संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेचे तंतोतंत मूल्यांकन केले जाऊ शकते.
त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था फार मोठी आहे. त्यानी सांगितले की, बरेच अर्थतज्ञ परचेसिंग पावर पॅरिटीनुसार कामगारांची उत्पादकता मोजतात. कारण यामुळे अमेरिकेच्या तुलनेत स्थानिक अर्थव्यवस्थेचा नेमका अंदाज येण्यास मदत होते. त्यानुसार भारताची अर्थव्यवस्था 15 लाख कोटी डॉलरची आहे. तर अमेरिकेची अर्थव्यवस्था 29 लाख कोटी डॉलरची आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यांकनही परचेसिंग पावर पॅरिटीनुसार केले आहे.
भारतीय कामगारांचे उत्पादकता कमी –
भारतीय कामगाराची उत्पादकता जी -20 देशात सर्वात कमी आहे. ती वाढविण्याची गरज आहे. आपल्याकडे तरुणांची संख्या जास्त आहे. मात्र या कामगारांची उत्पादकता कमी असल्यामुळे त्याचा उद्योगांच्या कार्यक्षमतेवर आणि अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. आपली उत्पादकता केवळ अमेरिकन कामगारापेक्षा कमी नाही तर वेगाने विकसित होणार्या चीन, व्हिएतनाम इत्यादी देशापेक्षाही आपल्या कामगाराची उत्पादकता कमी आहे. ती वाढविण्याची गरज असल्याचे मत बेरी यांनी व्यक्त केले. उत्पादकता वाढत नसल्यामुळे कामगारांचे वेतन वाढत नाही आणि तरुण सरकारी नोकरीच्या मागे लागतात या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.





