Indian Womens Team : भारतीय महिला संघाला आयसीसीचा दणका! ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड

Indian Women’s Team Fine for Slow Over Rate : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघावर स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. रविवारी विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या साखळी सामन्यात भारतीय संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण करता आली नाही. संघ एका षटकाने मागे राहिला, ज्यामुळे आयसीसीने आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत कारवाई करत संघाच्या सामन्याच्या मानधनातून ५ टक्के दंड आकारण्याचा निर्णय घेतला.
आयसीसीने का केली कारवाई?
आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, प्रत्येक संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या संघाची षटकांची गती धीमी आढळली, तर त्यांच्यावर आर्थिक दंड लावला जाऊ शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात भारतीय संघ निर्धारित षटकांच्या गतीच्या मागे राहिल्याने सामना अधिकाऱ्यांनी नियमांनुसार दंडाची कारवाई केली.
नियमांचे पालन करणे अनिवार्य –
या घटनेनंतर भारतीय संघ व्यवस्थापनाने षटकांच्या गतीवर लक्ष केंद्रित करून वेळेचे पालन सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे. आयसीसीने हा निर्णय खेळाची गती राखण्यासाठी आणि सर्व संघांसाठी समान नियम लागू करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. दंडाची रक्कम संघाच्या सामन्याच्या मानधनातून ५ टक्के स्वयंचलितपणे कपात केली जाईल. या निर्णयामुळे विश्वचषकात कोणत्याही संघाला वेळेच्या पालनाात ढिलाई करण्याची परवानगी नाही आणि सामन्यादरम्यान नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचा संदेश गेला आहे.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना प्रतिका रावलच्या ७५ आणि स्मृती मंधानाच्या ८० धावांच्या जोरावर ३३० धावांचा डोंगर उभा केला होता. ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँडने ५, तर सोफिया मेलोनेक्सने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४९ ओव्हरांत ३ गडी राखून विजय मिळवला. कर्णधार अॅलिसा हेलीने १४२, तर एलिस पेरीने नाबाद ४७ धावांची खेळी केली. भारताकडून श्री चरणीने ३ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – Team India : नव्या कर्णधाराची विराट-रोहितशी भेट! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच्या खास क्षणाचा VIDEO व्हायरल
भारतीय संघाने ४ पैकी २ सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध विजय मिळविल्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन पराभव पत्करावे लागले. भारतीय संघ १९ ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध, २३ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध आणि २६ ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. चाहत्यांना आशा आहे की भारतीय संघ पुढील फेरीत प्रवेश करेल.





