वॉशिंग्टन – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील मोठ्या उद्योजकांपैकी एक असणारे बिल गेट्स यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतासहीत अनेक विकसनशील देशांना लसनिर्मितीचा फॉर्म्यूला देऊ नये असे म्हटले आहे.
बिल गेट्स यांनी स्काय न्यूज या विदेशी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. यावेळी सध्याच्या वैश्विक करोनास्थितीवर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये बैद्धिक संपदा हक्का हा कायदा बाजूला केल्यामुळे जगातील सर्व देशांना करोना लस मिळण्यासाठी मदत होईल का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी लसीचा फॉर्म्यूला इतर देशांना देण्यात येऊ नये असे स्पष्टपणे सांगितले. जगात अनेक औषधनिर्माण करणाऱ्या कंपन्या करोना प्रतिबंधात्मक लस निर्मिती करत आहेत. सध्या जगातील लोक लसीच्या सुरक्षेबाबत अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे जगात सर्वांसोबत लसनिर्मितीचा फॉर्म्यूला शेअर केला जाऊ नये. लसनिर्मिती करणारी अमेरिकेची जॉन्सन अँड जॉन्सन आणि भारतात लस निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये मोठा फरक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
लस निर्मितीचा फॉर्म्यूला हा एखाद्या पाककलेसारखा नाही, जो कोणालाही देता येईल. इथे बौद्धिक संपदेच्या हक्काची गोष्ट नाही. तर येथे सुरक्षेचा मुद्दा आहे. लस तयार करताना काळजी घ्यावी लागते. टेस्टिंग तसेच ट्रायल करावे लागतात. तसेच लस तयार करताना खूप खबरदारी घ्यावी लागते, असे ते म्हणाले.
दरम्यान, बिल गेट्स यांनी केलेल्या वरील वक्तव्यानंतर जागितक पातळीवर त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जातो आहे. ब्रिटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ ऍक्सेस येथे कायद्याच्या प्राध्यापिका तारा वान यांनी भारतातील लोकांच्या मृत्यूला रोखले जाऊ शकत नसल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे. पश्चिमी देश भारताला मदत कधी करणार आहेत. मुळात अमेरिका आणि ब्रिटनने बौद्धिक संपदा हक्काच्या अधिकाराखाली इतर विकसनशील देशांना ओलीस ठेवले आहे. हे अतिशय घृणास्पद आहे, अशा शब्दांत बिल गेट्स यांच्यावर टीका केली.