Rice Export : भारताच्या तांदूळ निर्यातीला वेग; सहा महिन्यांत 5 टक्क्यांची वाढ
Rice Export :

Rice Export : भौगोलिक-राजकीय तणाव, अमेरिका-इराण संघर्ष आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता असतानाही भारताच्या तांदूळ निर्यातीने चांगली कामगिरी केली आहे. जानेवारी ते जून 2026 या सहा महिन्यांत भारतातून 12.27 दशलक्ष टन तांदळाची निर्यात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत 11.68 दशलक्ष टन निर्यात झाली होती. त्यामुळे यंदा निर्यातीत सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जागतिक तांदूळ निर्यात बाजारपेठेत भारताचा वाटा सुमारे 40 टक्के असल्याचे निर्यातदारांकडून सांगण्यात येते. भारतासोबत तांदूळ निर्यातीत थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान हे प्रमुख स्पर्धक देश आहेत. मात्र, या देशांच्या तुलनेत भारतातील तांदळाचे दर जागतिक बाजारपेठेत तुलनेने कमी असल्याने भारताला त्याचा फायदा होत आहे.
देशांतर्गत उत्पादन वाढल्याचा निर्यातीला फायदा –
गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशात तांदळाचे चांगले उत्पादन झाले. देशांतर्गत मागणीपेक्षा उत्पादन जास्त असल्याने अतिरिक्त तांदूळ निर्यात करण्याची संधी भारताला मिळाली. त्याचबरोबर भारतातील तांदळाचे तुलनेने कमी दर हेही निर्यात वाढण्यामागचे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या काळात बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये सुमारे 5 टक्क्यांची घट झाली आहे. जानेवारी ते जून 2026 या कालावधीत भारतातून सुमारे 3.7 दशलक्ष टन बासमती तांदळाची निर्यात झाली.
युद्धाचा बासमती निर्यातीवर परिणाम –
भारताचा बासमती तांदूळ सौदी अरेबिया, इराण यांसह अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. मात्र, या काळात पश्चिम आशियातील संघर्ष आणि भौगोलिक-राजकीय तणावामुळे संबंधित देशांमधील मागणीवर परिणाम झाला. परिणामी बासमतीच्या निर्यातीत घट झाली.
दुसरीकडे, बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीत सुमारे 9 टक्क्यांची वाढ झाली. बांगलादेश, आफ्रिकेतील विविध देश, कॅमेरून आणि श्रीलंका या बाजारपेठांमध्ये भारताच्या बिगर-बासमती तांदळाला चांगली मागणी मिळाली.
जुलैपासून निर्यातदारांसमोर नवे संकट –
जानेवारी ते जून या कालावधीत निर्यातीला चांगला वेग मिळाला असला तरी जुलै 2026 पासून निर्यातदारांसमोर लॉजिस्टिकचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मालवाहतुकीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, निर्यातीसाठी आवश्यक कार्गो आणि कंटेनर सहज उपलब्ध होत नसल्याची तक्रार निर्यातदारांकडून करण्यात येत आहे.
काही महिन्यांपूर्वी एका शिपमेंटसाठी सुमारे 1,500 ते 2,000 डॉलर मालवाहतूक खर्च येत होता. आता हाच खर्च 7,000 ते 7,500 डॉलरपर्यंत पोहोचल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे परदेशी खरेदीदारांना वाढलेला खर्च परवडत नसल्याने नवीन ऑर्डर्सवरही परिणाम होत आहे.
कार्गो उपलब्ध नसणे आणि उपलब्ध कार्गोसाठी वाढलेले दर यामुळे भारतीय तांदूळ निर्यातदारांवर मोठा आर्थिक दबाव निर्माण झाला आहे. ही परिस्थिती पुढील काही महिने कायम राहिल्यास यंदाचे निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण होऊ शकते.
सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा –
भारतीय तांदळाची जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता कायम ठेवण्यासाठी सरकारने मालवाहतुकीच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. अतिरिक्त तांदूळ देशात पडून राहण्याऐवजी त्याची निर्यात झाली तर देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळू शकते. तसेच तांदूळ निर्यातीशी संबंधित मोठ्या प्रमाणातील रोजगारही टिकून राहण्यास मदत होईल.
थायलंड, पाकिस्तान आणि व्हिएतनाम या प्रमुख स्पर्धक देशांशी स्पर्धा कायम ठेवण्यासाठी बासमती आणि बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी कार्गो उपलब्ध करून देणे आणि मालवाहतुकीचे दर कमी करणे आवश्यक आहे, अशी मागणी निर्यात क्षेत्रातून होत आहे.
“आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताला टिकून राहायचे असेल तर निर्यातदारांना कार्गो उपलब्ध करून देणे आणि वाढलेले वाहतूक दर कमी करणे गरजेचे आहे. अन्यथा निर्यातीवर, परकीय चलनाच्या उत्पन्नावर आणि या क्षेत्रातील रोजगारावर मोठा परिणाम होऊ शकतो,” अशी माहिती जयराज ग्रुपचे निर्यातदार धवल शाह यांनी दिली.





