Womens Champions Trophy : श्रीलंकेचा पत्ता कट, भारताला मिळाली धुरा! मुंबई अन् वडोदरामध्ये रंगणार पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार
Womens Champions Trophy : ६ अव्वल देशांचा समावेश असलेली ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत भारतात रंगणार आहे.

India To Host Inaugural ICC Womens Champions Trophy 2027 In Mumbai And Vadodara : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्यावहिल्या ‘वूमेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७’ च्या यजमानपदाची अधिकृत जबाबदारी भारताकडे सोपवली आहे. ६ अव्वल देशांचा समावेश असलेली ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत भारतात रंगणार आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक स्पर्धेतील सर्व सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) आणि गुजरातमधील वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.
श्रीलंकेकडून भारताकडे यजमानपद; १ सप्टेंबरला आयसीसीची अधिकृत घोषणा!
ही स्पर्धा आधी श्रीलंकेत आयोजित केली जाणार होती; मात्र आयसीसीच्या वार्षिक बैठकीतील प्रशासकीय सुधारणांच्या प्रक्रियेमुळे यजमानपद हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या यजमानासाठी भारत, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्या नावांची चाचपणी झाली. अखेर भारताच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून १ सप्टेंबर रोजी आयसीसी बोर्डाने या निर्णयाला अंतिम मंजुरी दिली. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी या स्पर्धेला महिला क्रिकेटच्या एका रोमांचक नव्या युगाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे.
६ दिग्गज संघ आमनेसामने; टी-२० फॉरमॅटमध्ये रंगणार चुरस –
A new chapter in women’s cricket is waiting to be written 🤩
The dates and venues for the inaugural Women’s Champions Trophy in 2027 are locked in 🔒https://t.co/QrY2iyDwyU
— ICC (@ICC) September 2, 2026
या पहिल्या आवृत्तीत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे ६ दिग्गज संघ जेतेपदासाठी झुंजणार आहेत. हे सर्व सामने आंतरराष्ट्रीय टी-२० (T20I) फॉरमॅटमध्ये खेळवले जातील. सर्व ६ संघ राऊंड-रॉबिन पद्धतीने एकमेकांविरुद्ध लढतील आणि गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये २८ फेब्रुवारी रोजी अंतिम महामुकाबला खेळवला जाईल.
वनडे वर्ल्डकप चॅम्पियन भारत आणि टी-२० चॅम्पियन ऑस्ट्रेलियात काँटे की टक्कर!
भारतीय महिला संघ सध्याचा वनडे वर्ल्डकप चॅम्पियन आहे, तर ऑस्ट्रेलियन महिला संघाने इंग्लंडमध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांचे मोठे आव्हान असणार आहे. देशातील क्रीडाप्रेमींसाठी ही स्पर्धा घरच्या मैदानावर महिला क्रिकेटचा थरार अनुभवण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.





