India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची शनिवारी ऑनलाईन बैठक झाली. त्यामध्ये संसदेत मोदी सरकारला घेरण्यासाठीचे प्रमुख ८ मुद्दे निश्चित करण्यात आले. त्यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला, भारत-पाकिस्तान संघर्षविरामाविषयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे, बिहारमधील मतदारयाद्या पडताळणी आदींचा समावेश आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे. त्याआधी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत २४ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले. कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया आणि राहुल गांधी या नेत्यांनी केले. ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राजदचे तेजस्वी यादव, तृणमूल कॉंग्रेसचे अभिषेक बॅनर्जी आदी नेत्यांनी बैठकीत सहभाग नोंदवला. त्यामुळे विरोधक एकत्रितपणे आणि आक्रमकपणे अधिवेशनाला सामोरे जाण्यास सज्ज झाल्याचे समोर आले.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडवणाऱ्यांचा अद्याप न्याय झाला नसल्याविषयी बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. परराष्ट्र धोरणातील अपयश, गाझामधील स्थिती, मतदारसंघ फेररचना तसेच अनुसूचित जाती-जमाती, महिला आणि अल्पसंख्याकांशी संबंधित मुद्देही अधिवेशनात लावून धरण्याचे बैठकीत ठरले. विरोधी पक्षांच्या विरोधात ईडीचा आणि मतदारांविरोधात ईसीचा (निवडणूक आयोग) वापर केला जात असल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विविध मुद्द्यांवर उत्तर द्यायला हवे, अशी अपेक्षा विरोधकांकडून व्यक्त करण्यात आली. ऑनलाईन बैठकीतून एकत्र असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. लवकरच इंडिया आघाडीची प्रत्यक्ष बैठक घेण्यावरही विरोधकांमध्ये सहमती झाली.





