Indapur News – वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेला उजाळा देणारा आणि संतसाहित्यातील तेजस्वी वारसा जपणारा भव्य अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्री संत नामदेव गाथा पारायण सोहळा ज्येष्ठ महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात संत परंपरेचा महासंगम अनुभवायला मिळत असून, भक्ती, संस्कृती आणि एकात्मतेचा अद्वितीय संगम घडत आहे. या महोत्सवात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 750 वा जन्मोत्सव, संत तुकाराम महाराज यांचा 375 वा सदेह वैकुंठगमन सोहळा, तसेच संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत सावता महाराज यांसह एकूण 94 संतांच्या स्मृतिदिनांचा एकत्रित उत्सव साजरा होत आहे. कीर्तन, प्रवचन, भजन आणि गाथा पारायण यांच्या माध्यमातून वारकरी भक्तीचा सागर उभा राहत असून, हा सोहळा सांस्कृतिक वारसा जपणारा ठरत आहे. या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे इंदापूर तालुक्याचा सामूहिक सहभाग. दि. 23 मे रोजी आमटी-भाकरी प्रसाद सेवा आयोजित करण्यात आली असून, प्रत्येक घरातून 11 भाकर्या, आमटी आणि गोड प्रसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावागावांतून हा प्रसाद एकत्र करून वेळेत पंढरपूर येथे पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात सेवा भावना, सहकार्य आणि सामाजिक एकात्मता अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामसभा, पत्रिका वितरण आणि सामूहिक वाहतूक व्यवस्थेद्वारे लोकसहभाग वाढवण्यात येत असून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा हा उपक्रम ठरत आहे. दरम्यान, इंदापूर येथील राम मंदिरात झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष भरत शहा आणि ह.भ.प. माऊली महाराज कदम (आळंदी देवाची) यांच्या उपस्थितीत नियोजन करण्यात आले. यावेळी वारकरी बांधवांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की, संत परंपरा ही समाजाची खरी ओळख असून या महोत्सवात सहभाग घेणे म्हणजे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा संदेश देणे आहे.