IND W vs WI W 1st ODI : मंधना-रेणुकाचे वादळ; पहिल्या वनडेत भारतानं वेस्ट इंडिजचा केला दारूण पराभव…

IND W vs WI W 1st ODI 2024 Match Result : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केला आहे.
रविवारी वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 211 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 314 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 26.2 षटकांत अवघ्या 103 धावांत गडगडला.
India dominant! It’s their biggest win against West Indies by runs in women’s ODIs 🔥
🔗 https://t.co/138IrT6JGp | #INDvWI pic.twitter.com/k2c7aNLdI1
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 22, 2024
भारताच्या विजयात स्मृती मंधानाने 91 धावांची खेळी करत तर रेणुका सिंगने 5 बळी घेत मोठा वाटा उचलला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रेणुका सिंग सामन्याची मानकरी ठरली. मालिकेतील दुसरा सामना या मैदानावर 24 डिसेंबर रोजी होणार आहे. तिसरा आणि शेवटचा सामना 27 डिसेंबर रोजी येथे होणार आहे.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. भारतासाठी सलामीवीर स्मृती मंधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी 23.2 षटकात 110 धावा जोडल्या. प्रतिका रावल 69 चेंडूत 40 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर स्मृतीही माघारी परतली. तिचे शतक अवघ्या 9 धावांनी हुकले. मंधनाने 102 चेंडूत 91 धावांची खेळी केली. तिने आपल्या खेळीत 13 चौकार मारले. त्यांच्याशिवाय हरलीन देओलनेही 44 धावांची आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने 34 धावांची खेळी खेळली. या सगळ्यात जेमिमाह रॉड्रिग्जनेही वर्चस्व गाजवले, तिने 19 चेंडूत 31 धावांची छोटी खेळी खेळली आणि भारताची धावसंख्या 300 धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. वेस्ट इंडिजसाठी गोलंदाजीत जैदा जेम्स ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. जेम्स हिने 8 षटकांत 45 धावांत 5 फलंदाज बाद केले. याशिवाय कॅरेबियन कर्णधार हेली मॅथ्यूजला 2 यश मिळाले. डिआंड्रा डॉटिनने 1 बळी घेतला.
वेस्ट इंडिजचा दारूण पराभव…
प्रत्युत्तरात 315 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर हेली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफ शून्यावर बाद झाले. परिस्थिती अशी होती की वेस्ट इंडिजचा निम्मा संघ 26 धावांवरच पॅव्हेलियनमध्ये परतला होता. शमन कॅम्पबेलने 21 धावा करून आणि एफी फ्लेचरने 24 धावा करून संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र एकूण कामगिरीचा विचार करता वेस्ट इंडिजचा पराभव निश्चित होता.
या सामन्यात वेस्ट इंडिजचे 7 फलंदाज धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. भारताकडून रेणुका ठाकूरने गोलंदाजीत सर्वाधिक 5 बळी घेतले. तिने यासाठी 10 षटकात 29 धावा खर्च केल्या. यासाठी तिला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. तिच्याशिवाय प्रिया मिश्राने 2 तर दीप्ती शर्मा आणि तीतस साधूने प्रत्येकी 1 बळी घेतला.
भारताचा दुसरा मोठा विजय
भारताने 211 धावांनी वेस्ट इंडिज संघाला नमविले. हा भारताचा आतापर्यंत दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी भारतीय संघाने 2017 मध्ये आयर्लंडला 249 धावांनी पराभूत करण्याची किमया केली होती. या लढतीमध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंनी प्रत्येकी 5 गडी बाद केले आहे. ही महिला क्रिकेटमधील केवळ चौथी वेळ आहे, ज्यामध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंनी पाच बळी घेण्याची किमया केली. भारताच्या रेणुका सिंग ठाकूरने एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रथमच 5 बळी घेण्याची कामागिरी केली.





