IND vs SL Final : आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारत-श्रीलंका आमनेसामने! २०२४ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज
IND vs SL Final : या महाअंतिम सामन्यात २०२४ च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेत जेतेपद पटकावण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

IND vs SL Women T20 Asia Cup 2026 Final Preview Harmanpreet Kaur : महिला टी-२० आशिया चषक २०२६ च्या (Women’s T20 Asia Cup 2026) विजेतेपदाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेविरुद्ध रंगणार आहे. संपूर्ण स्पर्धेत दोन्ही संघांनी अपराजित राहत अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा ४० धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने पाकिस्तानला ४ गडी राखून नमवले. आता रविवार, १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या महाअंतिम सामन्यात २०२४ च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेत जेतेपद पटकावण्याचा टीम इंडियाचा मुख्य इरादा असेल.
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताचे निर्विवाद वर्चस्व; ३१ पैकी २५ सामने जिंकले!
आशियाई क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय महिला संघाचा ट्रॅक रेकॉर्ड नेहमीच एकतर्फी राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ३१ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने तब्बल २५ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेला केवळ ५ सामने जिंकता आले आहेत (एक सामना अनिर्णित). आकड्यांचा विचार करता भारताचे पारडे नक्कीच जड दिसत असले, तरी दुबईची संथ खेळपट्टी आणि श्रीलंकेचा सध्याचा फॉर्म पाहता हरमनप्रीतच्या सेनेसाठी ही लढत सोपी नसेल.
आशिया चषकात फक्त एकच पराभव; २०२४ च्या ‘त्या’ जखमेवर मीठ चोळणार?
महिला टी-२० आशिया चषकाच्या इतिहासात भारत आणि श्रीलंका यांच्यात ५ सामने झाले असून भारताने ४ सामने खिशात घातले आहेत. श्रीलंकेला मिळालेला एकमेव विजय हा २०२४ च्या आशिया चषक अंतिम फेरीत मिळाला होता, जिथे त्यांनी भारताला ८ गडी राखून पराभूत करत ट्रॉफी जिंकली होती. आता सलग दुसऱ्यांदा या दोन बलाढ्य संघांमध्ये विजेतेपदाची लढत होत असल्याने भारताला त्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या फॉर्मवर नजर; विजेतेपदासाठी हवी मोठी खेळी –
या हायव्होल्टेज सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या फलंदाजीवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. चालू स्पर्धेत हरमनप्रीतची बॅट शांत राहिली असून मोठ्या सामन्यात संघाला सावरण्याची जबाबदारी तिच्यावर असेल. दुबईच्या संथ खेळपट्टीवर फिरकीपटूंची भूमिका निर्णायक ठरणार असून भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ दाखवल्यास आशिया चषकावर पुन्हा एकदा भारताचे नाव कोरले जाणे निश्चित मानले जात आहे





