IND vs SA : सलामीवीर कोण? संजू सॅमसन की शुबमन गिल? कर्णधार सूर्याने दिले थेट उत्तर

IND vs SA 1st T20I press match conference : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने कटक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. संघातील प्रमुख चर्चा होती की, सलामीची जबाबदारी कोणाला मिळणार संजू सॅमसनला की शुभमन गिलला? कर्णधाराने या विषयावर आपले मत स्पष्टपणे मांडले, तसेच प्लेइंग इलेव्हन आणि फलंदाजी क्रमाबद्दलही महत्त्वपूर्ण संकेत दिले.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या तयारीवर लक्ष केंद्रित करून टीम इंडियाने या मालिकेत आपल्या संघ संयोजनावर भर दिला आहे. सूर्यकुमारने स्पष्ट केले की, संघात जास्त बदल केले जाणार नाहीत, तर त्यांचे संपूर्ण लक्ष खेळण्याच्या पद्धती आणि मॅच स्ट्रॅटेजीवर असेल. तो म्हणाला, “आम्ही संघ संयोजनात जास्त बदल करणार नाही. आम्ही कोणत्या प्रकारचा क्रिकेट खेळू इच्छितो, यावरच आमचे लक्ष आहे.”
सलामीवीरांवरील सूर्यकुमारचे स्पष्ट मत –
संजू सॅमसन आणि शुबमन गिल या दोघांपैकी सलामीला कोण खेळणार, या प्रश्नावर कर्णधार म्हणाला की, “दोन्ही खेळाडूंसाठी संघात जागा आहे आणि दोघेही अत्यंत लवचिक आहेत.” संजू सॅमसनबद्दल बोलताना तो म्हणाला, “संजू असा फलंदाज आहे जो वरच्या क्रमाने खेळू शकतो. त्याने सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे. शुबमन सॅमसनच्या आधी खेळला, कारण तो त्या जागेसाठी पात्र होता, पण संजूलाही संधी मिळतील, याची आम्ही खात्री केली आहे.” या विधानावरून हे स्पष्ट होते की, कर्णधार दोघांवरही विश्वास ठेवतो आणि संघातील संतुलन कायम ठेवू इच्छितो.
फलंदाजी क्रमात लवचिकता
फलंदाजी क्रमाबद्दल विचारले असता, सूर्यकुमार यादवने सांगितले की, सलामीवीरांव्यतिरिक्त इतर खेळाडूंना लवचिक राहावे लागेल. त्यांना परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यावे लागेल. तो म्हणाला, “हे दोघे (गिल आणि संजू) आमच्या नियोजनाचा भाग आहेत आणि ते अनेक भूमिका पार पाडू शकतात. ही टीमसाठी एक चांगली गोष्ट आहे आणि एक ‘चांगली डोकेदुखी’ देखील आहे.”
कर्णधारने पुढे सांगितले की, विश्वचषकापूर्वी संघाला दोन मजबूत संघांविरुद्ध १० टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यामुळे सध्या या सामन्यांवर लक्ष केंद्रित आहे. विश्वचषक जवळ आल्यावर संघ हळूहळू आपले संपूर्ण लक्ष त्या स्पर्धेवर केंद्रित करेल. सूर्यकुमार यादवच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट होते की, टीम इंडिया टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये एक मजबूत संघ म्हणून उतरण्यासाठी संतुलन, लवचिकता आणि ठोस रणनीतीवर विशेष भर देत आहे.





