IND vs ENG : ‘अजून किती वर्ष पदार्पणाची वाट पाहायचीय…’, अभिमन्यु ईश्वरनच्या वडिलांचा निवड समितीला संतप्त सवाल

IND vs ENG Abhimanyu Easwaran father questioning selection criteria : भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज अभिमन्यु ईश्वरनला अजूनही कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंड दौऱ्यावरही तो संघासोबत गेला, पण मैदानावर खेळण्याऐवजी त्याच्यावर फक्त पुरवण्याची वेळ आली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचणाऱ्या अभिमन्यूला गेल्या तीन वर्षांपासून कसोटी पदार्पणाची वाट पाहावी लागत आहे. प्रत्येक परदेश दौऱ्यावर तो संघात सामील होतो, पण खेळण्याची संधी न मिळता परत येतो.
मागून १५ खेळाडूंचे पदार्पण, पण अभिमन्यु अजूनही प्रतीक्षेत –
या काळात १५ हून अधिक खेळाडूंनी अभिमन्युच्या आधी कसोटी पदार्पण केलं आहे, पण त्याचा नंबर अजूनही लागलेला नाही. या सततच्या दुर्लक्षामुळे अभिमन्युचे वडीलही निराश झाले आहेत. त्यांनी आपली खंत व्यक्त करताना सांगितलं, “मी अभिमन्युच्या कसोटी पदार्पणासाठी आता दिवस नाही, तर वर्षं मोजतोय. गेल्या तीन वर्षांपासून तो वाट पाहतोय. खेळाडूचं काम आहे धावा करणं, आणि अभिमन्युने ते करून दाखवलं आहे.”
अभिमन्युकडेच दुर्लक्ष का? वडिलांचा संताप –
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अभिमन्युचे वडील म्हणाले, “लोक म्हणतात की ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर इंडिया-अ संघाकडून खेळताना अभिमन्युने चांगली कामगिरी केली नाही, म्हणून त्याला संधी मिळाली नाही. ठीक आहे, मी हे मान्य करतो. पण बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी अभिमन्युने धावा केल्या, तेव्हा करुण नायर तर संघातही नव्हता. दुलीप करंडक आणि इराणी चषकासाठी करुणची निवडसुद्धा झाली नव्हती.”
हेही वाचा – IND vs ENG : कर्णधार गिलच्या चुकीमुळे संघाला बसला मोठा धक्का, चोरटी धाव घेणं पडलं महागात, पाहा VIDEO
ही पद्धत चुकीची –
अभिमन्यु ईश्वरनलाने गेल्या वर्षभरात देशांतर्गत क्रिकेटमध्ये सुमारे ८६४ धावा केल्या आहेत. तरीही त्याला कसोटी संघात संधी मिळालेली नाही. याबद्दल बोलताना त्यांचे वडील म्हणाले, “अभिमन्युने इतक्या धावा केल्या, तरी त्याची तुलना कशी होऊ शकते? करुण नायरने ८०० हून अधिक धावा केल्या म्हणून त्याला संधी मिळाली, हे ठीक आहे. निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला. पण काही खेळाडू केवळ आयपीएलच्या कामगिरीच्या जोरावर कसोटी संघात स्थान मिळवतात. ही पद्धत चुकीची आहे.”
हेही वाचा – IND vs ENG : अंपायर धर्मसेनांचा वादग्रस्त इशारा? भारतीय चाहत्यांचा संताप, सोशल मीडियावर खळबळ, पाहा VIDEO
निवड समितीने गांभीर्याने लक्ष द्यावे –
तो पुढे म्हणाला, “अभिमन्यु थोडा निराश आहे, पण हे तर होणारच. कसोटी क्रिकेटसाठी देशांतर्गत स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीच खरा निकष असायला हवी. निवड समितीने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.” अभिमन्युच्या वडिलांच्या या वक्तव्याने कसोटी संघ निवडीच्या निकषांवर पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. निवड समिती यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.





