India vs Bangladesh 1st Test Probable Playing XI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिका आता आणखी जवळ आली आहे. 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाचे जवळपास सर्व खेळाडू आता चेन्नईला पोहोचले असून त्यांचा सरावही सुरू झाला आहे. विराट कोहली लंडनहून थेट संघात सामील झाला आहे. दरम्यान, पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाचे प्लेईंग इलेव्हन कोणते असेल हा सर्वात मोठा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. खरं तर, संघ काय आहे हे रोहित शर्मा टॉसच्या वेळी सांगेल तेव्हाच स्पष्ट होईल, परंतु सध्या असे दिसते आहे की भारतीय संघात दोन खेळाडू असे आहेत की, त्यांना संघात स्थान मिळाले आहे, परंतु कदाचित त्याचा अंतिम 11 संघात समावेश नसेल. बीसीसीआयच्या निवड समितीने मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी चार वेगवान गोलंदाजांना संघात ठेवले आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्याशिवाय यात यश दयाल देखील आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हा सामना चेन्नईमध्ये होणार आहे, जिथे खेळपट्टी फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त मानली जाते. टीम इंडियाने आपल्या फिरकीपटूंच्या बळावर अवघ्या तीन दिवसांत येथे अनेक सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्मा दोनपेक्षा जास्त वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता फारच कमी आहे. दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटूंचे संयोजन असू शकते. चांगली गोष्ट म्हणजे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याचे दावेदार असलेले तीन फिरकीपटूही चांगली फलंदाजी करतात, त्यामुळे फारसा चिंतेचा विषय असणार नाही. यश दयाल, आकाशदीपला करावी लागणार प्रतीक्षा… टीम इंडियाच्या बॉलिंग कॉम्बिनेशनबद्दल बोलायचे झाले तर रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांच्या रूपात तीन फिरकी गोलंदाज असू शकतात आणि जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराज दुसरा वेगवान गोलंदाज असू शकतो. म्हणजे एकूण पाच गोलंदाज असतील. अशा स्थितीत संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आकाशदीप आणि यश दयाल यांना संधी मिळणे शक्य वाटत नाही. आकाश दीप भारतासाठी एक कसोटी खेळला आहे, ज्यामध्ये त्याने तीन विकेट्सही घेतल्या आहेत, परंतु यश दयाल त्याच्या पदार्पणाची वाट पाहत आहे. ज्यासाठी त्याला कदाचित आणखी थांबावे लागेल. दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा नंतर केली जाणार… निवडकर्त्यांनी पहिल्या सामन्यासाठीच संघ जाहीर केला आहे, म्हणजेच दुसऱ्या कसोटीसाठीही संघ नंतर जाहीर केला जाईल. त्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्यास आकाशदीप किंवा यश दयाल या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. मात्र, त्याआधी बांगलादेशचा संघ भारतात आल्यानंतर कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल. जर भारताने पहिला सामना सहज जिंकला तर बुमराहला विश्रांती देण्याचा विचार केला जाऊ शकतो. याचे कारण म्हणजे लवकरच न्यूझीलंडसोबतही कसोटी मालिका होणार असून, त्यात बुमराहचा समावेश असणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आता रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट कशी संघाची निवड करतात, कोणाला संधी देतात आणि भारतीय संघ कशी कामगिरी करेल हे पाहणे औत्सुकतेचे राहणार आहे. यष्टीरक्षक म्हणून पंतला पंसती… आता विकेटकीपरबद्दल बोलूया… कारण ऋषभ पंत आता टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने 21 महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये कमबॅक केले आहे. अपघातातून बरे झाल्यानंतर त्याची ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये ऋषभ पंतच्या यष्टिरक्षण आणि फलंदाजीमुळे प्रभावित होऊन निवडकर्त्यांनी त्याचा कसोटी संघात समावेश केला आहे. त्याची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी उत्कृष्ट आहे. तसेच त्याचा अनुभव पाहता प्लेईंग 11 मध्ये त्याचे स्थान निश्चित असणार आहे. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पदार्पणातच चमकदार कामगिरी करणाऱ्या ध्रुव जुरेलला संधी मिळणार नाही, पण रोहितसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण ध्रुव जुरेलने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील 3 सामन्यात 63.33 च्या सरासरीने 190 धावा आणि विकेटमागे 7 बळीही घेतले होते. तर दुसरीकडे पंतने 33 कसोटी सामन्यांच्या 56 डावांमध्ये 43.67 च्या सरासरीने 2271 धावा केल्या आहेत, तर त्याने 119 झेल आणि 14 स्टंपिंग देखील केले आहेत. सर्फराजला संधी नाही.. सर्फराज खानने इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत चमकदार कामगिरी करून आपल्यात प्रतिभा असल्याचे दाखवून दिले; पण केएल राहुलचा अनुभव पाहता पहिल्या कसोटीमध्ये प्लेइंग 11 मध्ये त्याचे स्थान निश्चित मानले जाते. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीचे लक्ष या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे राहुलचा 50 कसोटी सामन्यांचा अनुभव त्याला सरफराजपेक्षा पुढे असल्याचे दाखवतो. एकंदरीत, संघ व्यवस्थापनाला सरफराज खानचा वेग आणि एक दशकापासून राष्ट्रीय संघाचा भाग असलेल्या आणि कसोटी कर्णधार असलेल्या केएल राहुलचा अनुभव यापैकी एकाची निवड करावी लागेल. येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा की, राहुलने त्याच्या शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावले, जे अलीकडच्या काळातील सर्वोत्तम कसोटी डावांपैकी एक आहे आणि दुखापतीपूर्वी हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत त्याने 86 धावा केल्या होत्या. दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सरफराज खानला संधी मिळाली. जिथे त्याने 3 सामन्यांच्या 5 डावात 50 च्या सरासरीने 200 धावा केल्या होत्या. पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मो. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल. पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.