IND vs BAN । भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी 185 धावा करायच्या होत्या, मात्र पावसामुळे त्यांना 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र बांगलादेशला 16 षटकांत सहा विकेट्स गमावून केवळ 145 धावाच करता आल्या. या विजयामुळे टीम इंडियाचा सेमी फायनलमधला प्रवेश निश्चित मानला जात आहे.
#T20WorldCup | विराट कोहली टी-२० वर्ल्डकपमध्ये नंबर-१ फलंदाज, सचिनलाही टाकले मागे
प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकात कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 2 धावा काढून हसन महमूदचा बळी ठरला. येथून केएल राहुलने विराट कोहलीच्या साथीने भागीदारी रचली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत धावसंख्या 78 पर्यंत नेली. राहुलने अर्धशतक ठोकले आणि 32 चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह 50 धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने मैदानावर येताच फटकेबाजी सुरु केली. जलदगतीने धावा करण्याच्या नादात तो 16 चेंडूत 30 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल खास कामगिरी न करता बाद झाले.
यादरम्यान विराट कोहलीने धाडसी फलंदाजी करत यंदाच्या विश्वचषकातील तिसरे अर्धशतक झळकावले. विराटने 44 चेंडूत आठ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद 64 धावा केल्या. अश्विननेही शेवटी एक मोठा फटका खेळत नाबाद 13 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून गोलंदाजीत हसन महमूदने सर्वाधिक तीन बळी घेतले.
Bangladesh gave it their all, but India reign in Adelaide 🙌#T20WorldCup | #INDvBAN | 📝: https://t.co/vDRjKeeGvf pic.twitter.com/EOMtLYt3zb
— ICC (@ICC) November 2, 2022
प्रत्युत्तरात बांगलादेशाकडून फलंदाजीत लिटन दासने शानदार शैलीत सुरुवात केली. त्याने पॉवरप्लेमध्येच संघाची धावसंख्या पन्नाशीच्या पुढे नेली आणि 21 चेंडूत स्वतःचे अर्धशतकही पूर्ण केले. बांगलादेशने सात षटकात बिनबाद 66 धावा केल्या होत्या पण त्यानंतर पाऊस आला आणि काही काळ खेळ थांबवला. पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा बांगलादेशला नियमाप्रमाणे 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र त्यानंतर बांगलादेशचा खेळ बिघडला अन् संघाला 16 षटकांत 6 गडी गमावून 145 धावा करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ५ धावांनी जिंकला.