IND vs AUS : विराट-रोहितची ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड क्रेझ! सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

IND vs AUS ODI Series Tickets Sold Out : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे, पण याचवेळी एका मोठ्या सामन्याची चर्चा रंगली आहे, जिथे विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही एकत्र खेळताना दिसणार आहेत. होय, आश्चर्य वाटलं तरीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली आहे की, चार महिन्यांनंतर होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील सिडनी वनडेसाठी सर्व तिकिटे विकली गेली आहेत. भारत ऑक्टोबर-नव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, जिथे ते तीन वनडे आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत.
विराट-रोहितचा जलवा –
या मालिकेतील शेवटचा सामना ८ नोव्हेंबरला ब्रिस्बेन येथे होईल. वनडे मालिकेत विराट आणि रोहित खेळताना दिसतील, कारण दोघांनीही कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०२१७ च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोघांसाठीही महत्त्वाची आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात काय म्हटले?
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले, “सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी) येथील वनडे आणि मनुका ओव्हल (कॅनबरा) येथील टी-२० सामन्यांची तिकिटे सामन्यांना चार महिने बाकी असतानाच संपली आहेत, जे या सामन्यांच्या प्रचंड मागणीचे द्योतक आहे. तसेच, एमसीजी टी-२० आणि गाबा टी-२० सामनेही खूप लोकप्रिय होत आहेत.” क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढे सांगितले की, “अॅशेस सामन्यांसाठी विक्रमी तिकिट विक्री झाल्यानंतर, आता व्हाइट-बॉल सामन्यांनाही प्रचंड मागणी आहे. तिकिट विक्री सुरू झाल्याच्या अवघ्या दोन आठवड्यांत आठ सामन्यांसाठी ९०,००० हून अधिक तिकिटं विकली गेली आहेत.”
हेही वाचा – Rohit Sharma : ‘…म्हणून हार्दिक पंड्याला किस केलं होतं’, रोहित शर्माने केला खुलासा
भारतीय चाहत्यांच्या क्लबांनी सर्वाधिक तिकीटं केली खरेदी –
त्यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंत विकल्या गेलेल्या तिकिटांपैकी १६ टक्क्यांहून अधिक तिकिटं भारतीय चाहत्यांच्या क्लबांनी खरेदी केली आहेत. भारत आर्मी हा सर्वात सक्रिय चाहता क्लबांपैकी एक आहे, ज्याने २,४०० हून अधिक तिकिटं खरेदी केली आहेत. फॅन्स इंडिया या क्लबनेही जबरदस्त उत्साह दाखवत १,४०० हून अधिक तिकिटं खरेदी केली आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे वातावरण आणखी खास केले. त्यांनी एका निवेदनात म्हटले की, हा ऑस्ट्रेलिया दौरा विराट कोहली आणि रोहित शर्माचा शेवटचा दौरा असू शकतो. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी ही मालिका खास बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.





