IND vs AUS 2nd Test : स्टार्कच्या भेदक माऱ्यापुढे टीम इंडिया 180 धावांवर गारद, रोहित-विराट ठरले अपयशी…

IND vs AUS 2nd Test (Ind 1st inning) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यास आजपासून सुरूवात झाली आहे. ही डे नाईट(रात्र-दिवस) स्वरूपाची टेस्ट आहे. गुलाबी चेंडूने खेळली जाणारी ही कसोटी ॲडलेड ओव्हलवर खेळवली जात आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा पहिला डाव 180 धावांवरच आटोपला. नितीश रेड्डी यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली. त्याने 54 चेंडूंचा सामना करत 42 धावा केल्या. शुभमन गिलने 31 धावांचे योगदान दिले. तर केएल राहुल 37 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने 6 विकेट घेतल्या. स्टार्कची कसोटी कारकिर्दीतील पाच बळी घेण्याची ही 15वी वेळ होती. याव्यतिरिक्त पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
Nitish Kumar Reddy top-scores with 42 as #TeamIndia post 180 in the 1st innings.
Final Session of the day coming up.
Live ▶️ https://t.co/upjirQCmiV#AUSvIND pic.twitter.com/HEz8YiRHc0
— BCCI (@BCCI) December 6, 2024
भारताचा डाव….
टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी झाली. स्टार्कने ही भागीदारी तोडली. त्याने राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राहुलला 37 धावा करता आल्या. तो बाद होताच विकेट्सची पडझड सुरू झाली.
विराट कोहली सात धावा करून, शुभमन गिल 31 धावा करून आणि कर्णधार रोहित शर्मा तीन धावा करून बाद झाला. जिथे एकवेळ भारताची धावसंख्या एका विकेटवर 69 धावा होती तिथे काही वेळानंतर भारताची स्थिती 5 बाद 87 धावा अशी झाली. म्हणजेच 18 धावा करताना भारताने आणखी चार विकेट गमावल्या होत्या.
यानंतर ऋषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र कमिन्सने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पंतने 21 धावा करून माघारी परतला. त्यानंतर अश्विनने नितीश रेड्डीसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि सातव्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली. मात्र, स्टार्कने पुन्हा एकदा भारताला अडचणीत आणले आणि अश्विनला 22 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.
त्यानंतर हर्षित राणा आणि जसप्रीत बुमराह खाते न उघडताच बाद झाले. त्यानंतर 54 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 42 धावा करणारा नितीश रेड्डी टीम इंडियाची शेवटची विकेट म्हणून स्टार्कचा सहावा बळी ठरला. मिचेल स्टार्कनं जैस्वाल,राहुल, विराट, नितिश रेड्डी, अश्विन आणि हर्षित राणा या भारतीय फलंदाजांना बळी बनवले.





