IND vs AFG : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय! युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला डच्चू, नेमकं कारण काय?
IND vs AFG : भारतीय संघ व्यवस्थापनाने युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला बाहेर बसवत अनुभवी खेळाडूला संधी दिली आहे.

IND vs AFG 1st T20I Toss Vaibhav Sooryavanshi Dropped Sanju Samson Opens for India : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला रणसंग्राम दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू झाला आहे. सामन्याची नाणेफेक पार पडली असून भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन जाहीर झाली असून, संघ व्यवस्थापनाने युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला बाहेर बसवत संजू सॅमसनवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
संजू सॅमसनकडे सलामीची धुरा; वैभव सूर्यवंशीला डच्चू!
प्लेइंग इलेव्हनच्या निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. संघ व्यवस्थापनाने युवा वैभव सूर्यवंशीला विश्रांती देत संजू सॅमसनला अभिषेक शर्मासोबत सलामीला उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. संजूसाठी स्वतःला सिद्ध करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे.
मायदेशात श्रेयस अय्यरची पहिलीच परीक्षा; विजयाने सुरुवात करण्याचा निर्धार!
कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची भारतीय भूमीवर ही पहिलीच टी-२० मालिका आहे. यापूर्वी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावरील सात टी-२० सामन्यांत भारताला एकाही विजयाची नोंद करता आली नव्हती. त्यामुळे सुरुवातीचा कटू अनुभव मागे सारून मायदेशातील चाहत्यांसमोर विजयाने मोहिमेची सुरुवात करण्याचा अय्यरचा निर्धार असेल.
अफगाणिस्तानविरुद्ध ९ पैकी ८ विजय; इतिहास बदलणार का?
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारत आणि अफगाणिस्तान आतापर्यंत ९ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये भारताने ८ सामन्यांत निर्विवाद बाजी मारली असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. आजपर्यंत भारताला कधीही न हरवू शकलेला अफगाणिस्तानचा संघ आपल्या अधिकृत यजमानपदाखाली पहिल्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारताची प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
अफगाणिस्तानची प्लेइंग इलेव्हन: इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सादिकुल्ला अटल, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी.





