Nana Patole : कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले ; काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ
Nana Patole : काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी कोरोना लशींसंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे.

Nana Patole : २०१९ च्या अखेरीस चीनमधील वुहान शहरात आढळलेल्या कोरोना विषाणूने पुढील काळात जगभरात थैमान घातले. भारतासह अनेक देशांमध्ये या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. जवळपास दोन ते तीन वर्षे जगाला या महासंकटाचा सामना करावा लागला. कोरोना प्रतिबंधासाठी भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. मात्र, या लशींच्या परिणामकारकतेपासून ते संभाव्य दुष्परिणामांपर्यंत अनेक दावे-प्रतिदावे आजही चर्चेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी कोरोना लशींसंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर लोकांमध्ये कर्करोग (कॅन्सर) आणि हृदयविकाराच्या झटक्याचे (हार्ट अटॅक) प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.
तसेच केंद्र सरकारच्या तत्कालीन धोरणांवर आणि आरोग्य व्यवस्थेवर निशाणा साधत त्यांनी या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
“देशात कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मात्र, या लशीचे अत्यंत घातक परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. कोरोना लस घेतलेल्या नागरिकांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे तसेच कर्करोगासारखे गंभीर आजार जडण्याचे प्रमाण वेगाने वाढले.”
स्थानिक राजकीय वातावरण तापलं
गोदिंयामधील विकासकामांवरुन स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना काँग्रेस जिल्ह्याध्यक्षाने थेट काँग्रेसमध्ये येण्याची खुली अॅाफर दिली आहे. ते म्हणाले “विकास कामं करताना महायुतीचेचं मित्रपक्ष किंवा कार्यकर्ते जर आमदारांची कोंडी करत असतील, तर त्यांनी बिनधास्त काँग्रेसमध्ये यावं.” काँग्रेस नेत्याच्या या अॅाफरवर स्थानिक राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची वर्तवली जात आहे.






