Sanjay Raut : डीजेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री तटस्थ भूमिकेत; संजय राऊत यांची टीका
शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डीजेवरील बंदीच्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डीजेवरील बंदीच्या वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ध्वनी प्रदूषणामुळे लोकांमध्ये संताप वाढत असतानाही फडणवीस यांनी या मुद्द्यावर कोणतीही ठोस भूमिका न घेता तटस्थ राहिले आहेत किंवा कुंपणावर बसले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबई आणि नागपूरच्या तुलनेत पुण्यात वेगळी वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. मुंबई आणि नागपूरमध्ये पोलीस प्रमुखांनी मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टिम्सवर निर्बंध लागू केले आहेत. लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि डीजे साऊंड सिस्टिम्समुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांबद्दल बोलत आहेत. हे मुद्दे केवळ पुण्यापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा संबंध संपूर्ण महाराष्ट्राशी आहे, असे ते म्हणाले.
राऊत यांनी मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या भावाच्या मृत्यूचा उल्लेख केला आणि सांगितले की, त्यांनी स्वतःच डीजेच्या आवाजामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल भाष्य केले होते. तसेच, त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका महिलेचाही उल्लेख केला, कारण मोठ्या आवाजामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकल्याने, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होते.
तसेच, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, तर फडणवीस नेहमीप्रमाणेच तटस्थ भूमिका घेऊन परिस्थिती पाहत आहेत. जे मुख्यमंत्री गृहमंत्रीही आहेत, तेच जर एखाद्या सामाजिक मुद्द्यावर तटस्थ राहून केवळ परिस्थिती पाहत असतील, तर कायद्याच्या राज्यावर आधारित सरकार चालवत असल्याचा दावा कसा करता येईल? असा सवाल त्यांनी (Sanjay Raut) उपस्थित केला.
नागपूर आणि मुंबई पोलिसांनी या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली असताना पुण्यात मात्र वेगळी स्थिती का असावी, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. पुण्यात नक्की काय आहे? मुख्यमंत्र्यांवर काही दबाव आहे का? त्यांनी याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.






